मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल होणार, विधानसभेत केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:39 IST2025-12-15T12:38:03+5:302025-12-15T12:39:02+5:30
Nagpur : महामार्गाचा सोलापूर ते चंदगड नवा आराखडा तयार करणार, २०२६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात; समृद्धीचा गोंदियापर्यंत विस्तार; मुंबई-हैदराबाद नवा जनकल्याण महामार्ग, मुंबई-लातूर अंतर ४ तासांवर

Chief Minister's big decision! There will be a change in the route of 'Shaktipith', announced in the Legislative Assembly
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाजवळून जात असल्याने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात सोलापूर-सांगली-चंदगड या टप्प्यात बदल करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत केली. या महामार्गाचे प्रत्यक्ष काम २०२६ मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर ते गोवा अशा या महामार्गाचा जुना आराखडा बदलण्यात आला आहे. मुंबई-कल्याण-लातूर-हैदराबाद अशा नव्या जनकल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
विधानसभेत विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. शक्तिपीठ महामार्ग ८०२ किमी लांबीचा असून, त्यावर
८६,५३९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे नागपूर-गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार असून, यामुळे मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यातून हा महामार्ग जाणार असल्याने याचा फायदा या तालुक्यांच्या विकासासाठी होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तार
समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर-गोंदियापर्यंत केला जाणार असून, तो १६२ किमी लांबीचा १८ हजार ५३९ कोटी खर्चाचा मार्ग आहे. जमीन संपादन अंतिम टप्प्यात असून, तो पूर्ण झाल्यानंतर नागपूरहून सव्वातासात गोंदियाला पोहोचता येईल. भंडारा-गडचिरोली महामार्ग २४ कोटींचा असून, त्यासाठी १२,९०३ कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. त्याशिवाय नागपूर-चंद्रपूर महामार्ग तयार करत आहोत. गडचिरोलीत कॉरिडॉर केला जात असून, २४०० कोटी खर्च केला जाणार आहे.
मुंबई-हैदराबाद अंतर कमी होणार
मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी समृद्धी महामार्गावरून जालना-नांदेड-निजामाबाद हा ७१७ किमी आणि मुंबई-पुणे-सोलापूर-हैदराबाद हा ७०७ किमी असे दोन महामार्ग आहेत. मात्र, या नवीन महामार्गामुळे मुंबई-हैदराबाद अंतर ५३० किमीवर येणार आहे. मुंबईहून लातूर अंतर चार तासांवर येणार आहे. या महामार्गाची महाराष्ट्रातील लांबी ४५० किमी आहे. अंदाजे ३६ हजार कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग ठाणे-पुणे-अहिल्यानगर, बीड आणि लातूर या पाच जिल्ह्यांना जोडणार आहे. यामुळे मुंबई-हैदराबाद अंतर १३० किमीने कमी होणार आहे.
सिंचन अनुशेष दूर होण्याच्या मार्गावर
विदर्भ-मराठवाड्यात १३ लाख ८३ हजार हेक्टरचा सिंचन अनुशेष होता. यातील १३ लाख ३४ हजार हेक्टरचा अनुशेष संपला. आता ४९ हजार हेक्टरचा राहिला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
पाणी कोकणातून गोदावरी खोऱ्यात
कोकणात पुराचे वाहून जाणारे १०० टीएमसी पाणी उजनीपर्यंत आणायचे. ते प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यात पाणी न्यायचे नियोजन आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या दोन वर्षांत मोठी नोकरभरती
महायुती सरकार आल्यानंतर महाभरती उपक्रम सुरू केला. ३ वर्षात राज्यात १ लाख २० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. पुढील दोन वर्षात तेवढ्याच नोकऱ्या देण्याचा निर्णय केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
"सरकारच्या एका वर्षाच्या कालावधीत अनेक आव्हानांचा समर्थपणे सामना केला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे आता गतीने काम करणार असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. आमचा प्रयत्न सकारात्मकतेने पुढे जाण्याचा आहे. नगरपालिका निवडणुकीतही आम्ही विकासाचा अजेंडा मांडला. २०३५ चा अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्यासाठी वाटचाल करायची असून अमतृमहोत्सवाकडे जाताना रचनात्मक कार्यातून महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री