दोनदा ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरलेली ‘आप’ कुणाचा वाढविणार ताप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 07:00 AM2022-01-18T07:00:00+5:302022-01-18T07:00:07+5:30

Nagpur News आता नागपूर मनपा निवडणुकीसाठी उत्साहात असलेले ‘आप’चे कार्यकर्ते कुणाचा ताप वाढवतात की पुन्हा तिसऱ्यांदा तोंडघशी पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Challenge before 'Aap' also others in NMC election in Nagpur | दोनदा ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरलेली ‘आप’ कुणाचा वाढविणार ताप?

दोनदा ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरलेली ‘आप’ कुणाचा वाढविणार ताप?

Next
ठळक मुद्दे मनपाच्या निवडणुकीत पहिल्यांदा आजमविणार जोर

कमलेश वानखेडे

नागपूर : दिल्ली गाजवणारी आम आदमी पार्टी यावेळी नागपूर महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहे. ‘आप’ने २०१४ मध्ये नागपूर लोकसभेत लक्षणीय मते घेत लक्ष वेधले होते. मात्र, नंतरची पाच वर्षे संघटन बांधणी करूनही २०१९ मध्ये विधानसभेच्या ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरले. त्यामुळे आता मनपा निवडणुकीसाठी उत्साहात असलेले ‘आप’चे कार्यकर्ते कुणाचा ताप वाढवतात की पुन्हा तिसऱ्यांदा तोंडघशी पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर देशभरात त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याच काळात भ्रष्टाचाराविरोधात पक्षाने लढा तीव्र केला होता. अशात ‘आप’ने २०१४ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी दिली. दमानिया आक्रमकपणे लढल्या. त्यांना नागपूरकर मतदारांची अनपेक्षित साथही मिळाली. त्यावेळी नवखा पक्ष असताना, नागपुरात पहिल्यांदाच निवडणूक लढवित असतानाही दमानिया यांना तब्बल ६९ हजार ८१ मते मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा हजार व अधिक मते मिळाली. पश्चिम नागपुरात १३ हजार ७६ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपुरात तब्बल १४ हजार ३१३ मते मिळाली. मतांची ही आकडेवारी राजकीय पक्षांना धडकी भरविणारीच होती. यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे उमेदवार रिंगणात उतरले नाही. मात्र, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अन्यथा नोटाचा वापर करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभेच्यावेळी जोशात असलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

२०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीतही आप प्रत्यक्ष मैदानात उतरली नाही. यावेळीही तीच भूमिका कायम ठेवली. पक्षाकडून त्यावेळीही कुणाला एकाला पाठिंबा दिला गेला नाही. त्यामुळे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते विखुरले व मनाला पटेल त्याचे काम करताना दिसले. यानंतर २०१९ मध्ये ‘आप’ने महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविलीच नाही. यामुळे संघटन बांधणीत जुंपलेल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात ‘पब्लिक टेस्ट’ घेता आली नाही. २०१९ मध्ये राज्यात विधानसभेच्या २५ जागा लढविल्या. यात नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम व ग्रामीणमधील रामटेक मतदारसंघाचा समावेश होता. पाच वर्षांच्या पक्षबांधणीनंतरही ‘आप’च्या उमेदवारांना दखलमात्र मते घेता आली नाहीत. अंजली दमानिया यांना दक्षिण-पश्चिम नागपुरात १४ मते ३१३ मिळाली होती. मात्र, २०१९ मध्ये याच मतदारसंघात अमोल हाडके यांना जेमतेम १,१२५ (०.५९ टक्के) मते मिळाली. तर रामटेकमधून लढलेले इश्वर गजबे यांना फक्त ८३४ मते (०.४५ टक्के) मिळाली. दुसऱ्याचा ताप वाढविण्यासाठी रिंगणात उतरलेली ‘आप’ स्वत:च तोंडघशी पडली.

‘आप‘चा राजकीय आलेख

२०१४ मध्ये नागपूर लोकसभेत अंजली दमानिया लढल्या.

२०१४ ची विधानसभा लढले नाही.

२०१७ नागपूर महापालिका लढले नाही.

२०१९ : महाराष्ट्रात लोकसभा लढले नाही.

२०१९ : राज्यात विधानसभेच्या २५ जागा लढले. नागपुरात दक्षिण-पश्चिम व रामटेक या दोन जागा लढल्या.

२०२२ : महापालिका निवडणूक लढणार

Web Title: Challenge before 'Aap' also others in NMC election in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPआप