भोला, राजमंगल अन् राणी तूर्त रेशीमबागेतच राहणार

By Admin | Updated: January 6, 2015 01:05 IST2015-01-06T01:05:20+5:302015-01-06T01:05:20+5:30

तीन हत्तींना अवैधरीत्या नागपुरात आणल्यावरून वन विभागाने जप्त केले. परंतु हे हत्ती आपल्या माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पारवानी यांच्या न्यायालयाने

Bhola, Rajmangal and Rani will remain in Silkbag immediately | भोला, राजमंगल अन् राणी तूर्त रेशीमबागेतच राहणार

भोला, राजमंगल अन् राणी तूर्त रेशीमबागेतच राहणार

नागपूर : तीन हत्तींना अवैधरीत्या नागपुरात आणल्यावरून वन विभागाने जप्त केले. परंतु हे हत्ती आपल्या माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पारवानी यांच्या न्यायालयाने तूर्त माहुतांच्या ताब्यात दिले आहे. १० जानेवारी रोजी त्यांना नेमके वन विभागाच्या की माहुतांच्याच ताब्यात द्यायचे, हे निश्चित होणार आहे.
या हत्तींपैकी दोन हत्ती आणि एक हत्तीणी आहे. भोला, राजमंगल आणि राणी, अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या हमीदपूर भागातून नागपुरात आणण्यात आले होते. रेशीमबागेत पंचकल्याणक महा महोत्सव सुरू असून, त्यांना मिरवणुकीत सहभागी करण्यात येणार होते. अचानक पीपल्स फॉर अ‍ॅनिमल नावाच्या एनजीओने वन विभागाकडे तक्रार केली आणि वन विभागाने या तिन्ही हत्तींना ताब्यात घेतले. हत्तींचा वन्यप्राण्यांच्या अनुसूची क्रमांक १ मध्ये समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीचा परवाना (ट्रान्झिट पास) अत्यावश्यक असते. हत्तींना सांभाळणाऱ्या माहुतांकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ट्रान्झिट पास नव्हती. तातडीने मालक इद्रीस अहमद बद्रुद्दीन याला बोलावण्यात आले. त्याच्याकडे तर या तिन्ही हत्तींचे मालकीहक्कही नव्हते. त्यामुळे हत्तींना जप्त करून इद्रीस याला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची २५ हजाराच्या जामिनावर सुटका केली. हत्ती माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना तूर्त रेशीमबाग येथेच ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Bhola, Rajmangal and Rani will remain in Silkbag immediately