राज्यात आंबेडकर साहित्य अकादमी उघडणार

By Admin | Updated: August 22, 2016 02:47 IST2016-08-22T02:47:30+5:302016-08-22T02:47:30+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी साहित्यक्षेत्रालादेखील नवी दिशा दिली. बाबासाहेबांची विचारसंपदा मौलिक आहे.

Ambedkar Sahitya Academy will open in the state | राज्यात आंबेडकर साहित्य अकादमी उघडणार

राज्यात आंबेडकर साहित्य अकादमी उघडणार

राजकुमार बडोले : राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी साहित्यक्षेत्रालादेखील नवी दिशा दिली. बाबासाहेबांची विचारसंपदा मौलिक आहे.
त्यांच्या विचारांचा आणखी प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी उघडण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आपल्या देशात महापुरुषांचे विविध जातीधर्मातील लोकांनी विभाजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एका विशिष्ट जातीधर्मापुरता मर्यादित नव्हता. त्यांचे विचार हे सर्वांसाठी होते. परंतु काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा बाजार करत आहेत.
ही बाब दुर्दैवी आहे, असे परखड मत बडोले यांनी व्यक्त केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विदर्भातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

भाषणातून नव्हे, कृतीतून होते प्रबोधन : श्रीहरी अणे
अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी परिसंवादादरम्यान ‘विद्यार्थी आणि समाजप्रबोधन’ या मुद्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी खरोखरच प्रबोधन करू शकतात का असा प्रश्न त्यांनी सुरुवातीलाच उपस्थित केला. ज्ञान असलेली कुठलीही व्यक्ती प्रबोधन करू शकते. परंतु प्रबोधन हे कधीही भाषणांमधून किंवा बोलून होत नसते. भाषण ही प्रबोधनाची निकृष्ट पद्धती आहे. खरे प्रबोधन हे कृतीमधूनच होते. विद्यापीठ, शाळा यांना मर्यादा असली तरी त्यांच्या माध्यमातून प्रबोधन होतेच. महात्मा गांधी,डॉ.आंबेडकर यांनी आंदोलनाची जी अहिंसक शस्त्रे सांगितली त्यावर चालले पाहिजे. इतर आयुध ही धोकादायक ठरू शकतात. प्रत्येक व्यक्ती ही समाजामुळेच घडत असते. त्यामुळे समाजाला आपणदेखील काहीतरी देणे लागतो ही भावना मनात बाळगायला हवी, असे अ‍ॅड.अणे म्हणाले.
बाबासाहेबांच्या मूल्यांची चर्चा व्हावी : यशवंत मनोहर
ज्येष्ठ कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी परिसंवादात ‘विद्यार्थ्यांचे भारतीयत्व’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ देशापुरतेच नव्हे तर जगाच्यादेखील हिताचे होते. त्यामुळे आज त्यांचे जगात महत्त्व वाढले आहे. त्यांच्या विचारांमुळेच भारतीयांना स्वतंत्र विचार करण्याची शक्ती मिळाली. माणसाला संघर्ष मोठे करतो. त्याच्याकडे पाठ फिरवू नका, असे ते म्हणाले. त्यांनी संघर्ष केला व नेहमी मोठे संघर्ष उभारायचे अशी शिकवण दिली. संविधानाला आधुनिक मूल्यांचा चेहरा बाबासाहेबांमुळेच मिळाला. त्यांच्या चरित्राचा अभ्यास तर झालाच पाहिजे. परंतु त्यांच्या मूल्यांची चर्चा जास्त होणे आवश्यक आहे. त्यांचे विचार हे क्रांतीचा ‘पासवर्ड’च म्हटले पाहिजे, असे डॉ.मनोहर म्हणाले.
महिलांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता : रुपा कुळकर्णी-बोधी
परिसंवादादरम्यान डॉ.रुपा कुळकर्णी-बोधी यांनी ‘सामाजिक परिवर्तनात युवतींची भूमिका’ या मुद्यावर मौलिक विचार मांडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दलित,वंचित, मजूर यांच्यासोबतच महिलांनादेखील मोठा न्याय मिळाला. महिला स्वतंत्रपणे विचार करायला लागला. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची केलेली सुरुवात ही सामाजिक परिवर्तनाची नांदी होती. आज महिला इतक्या सक्षम झाल्या आहेत की मनात आणले तर त्या सहज बदल घडवून आणू शकतात. परंतु बऱ्याच महिलांना अद्यापही मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तनातून हे शक्य आहे व यासाठी महिला व प्रामुख्याने विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ.रुपा कुळकर्णी-बोधी यांनी केले.

Web Title: Ambedkar Sahitya Academy will open in the state