२७६ ग्रॅम सोने घेऊन फरार कारागीर 'हावडा एक्सप्रेस'मध्ये जेरबंद!
By नरेश डोंगरे | Updated: August 18, 2025 19:11 IST2025-08-18T19:10:24+5:302025-08-18T19:11:21+5:30
प. बंगालमधून २७ लाखांचे सोने लंपास : सांगली जिल्ह्यातील 'कारागिर' जेरबंद

Absconding artisan caught in 'Howrah Express' with 276 grams of gold!
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम बंगालमधील एका सराफा व्यापाऱ्याकडचे तब्बल २७६ ग्राम सोन्याचे दागिने घेऊन पळ काढणाऱ्या एका 'कारागिराला' रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाने जेरबंद केले. आरपीएफने रविवारी हावडा एक्सप्रेसमध्ये ही सिनेस्टाईल कारवाई केली. अतूल सतीश जाधव (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील बलवन, आठपाडी येथील रहिवासी होय.
पश्चिम बंगालमधील नेहाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असललेल्या एका सराफा व्यावसायिकाकडे अतुल कलाकुसरीचे दागिने तयार करण्याचे काम करीत (कारागिर) होता. १५ ऑगस्टपूर्वी त्याच्याकडे सराफा व्यावसायिकाने नेहमीप्रमाणे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने दिले होते. त्यातील २७६ ग्राम सोने घेऊन सतीशने पत्नी तसेच वडिलांसह पळ काढला. १६ ऑगस्टला तो गायब झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने नेहाटी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली. तो कोलकाता येथून हावडा एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे जात असल्याचे लक्षात येताच नेहाटी पोलिसांनी बिलासपूर कंट्रोल रूमच्या माध्यमातून नागपूर आरपीएफला माहिती दिली. ती कळताच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतीश जाधवचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार, वेगवेगळ्या पथकाने हावडा एक्सप्रेसमध्ये शोधमोहिम सुरू केली. गाडी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा जवळ आली असताना पीएसआय दीपक कुमार, के. के. निकोडे आणि सहकाऱ्यांना कोच नंबर बी-७ मध्ये पत्नी आणि वडिलांसह आढळला. त्याला ताब्यात घेऊन गोंदिया चाैकीत नेण्यात आले.
सोन्याचे बिस्किट, चॉकलेट अन् ...
सतीशच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या जवळ चोरीच्या गुन्ह्यात नोंद असलेले सोन्याचे बिस्किट, चॉकलेट असे २७६ ग्राम सोने आढळले. ते जप्त करून नेहाटी (प. बंगाल) पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, तिकडून पोलिस पथक गोंदियाकडे निघाल्याचे समजते.
अनेकदा कारवाई
दुसऱ्या राज्यात गुन्हे करून रेल्वेने नागपूरकडे पळून आलेल्या अनेक गुन्हेगारांना यापूर्वीही अशाच प्रकारे अटक करण्यात आली असून, या कारवाईनंतर प.बंगाल पोलिसांनी आरपीएफच्या कामगिरीचे काैतूक करून आभार मानल्याचे आरपीएफ आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी पत्रकारांना सांगितले. रेल्वेत अशा प्रकारे रोकड, दागिने, अंमली पदार्थ किंवा मानवी तस्करी करणारे कुणी व्यक्ती आढळल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईनला किंवा आरपीएफला कळवावे, असे आवाहनही आर्य यांनी केले आहे.