Tauktae Cyclone: धडा ‘तौक्ते’ वादळाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:32 AM2021-05-23T10:32:21+5:302021-05-23T10:32:51+5:30

Tauktae Cyclone: ‘तौक्ते’ वादळ प्रचंड मनुष्य आणि वित्तहानी करून हळूहळू थंडावत गेले. अरबी समुद्रातील वादळे ही तशी फारसा पूर्वेतिहास नसलेली. मात्र ‘तौक्ते’ खरोखर आपणा सर्वांना विशेषतः सरकारच्या या व्यवस्थेला खाशी शिकवण देणारे होते, असे म्हणायला हवे.

Tauktae Cyclone: Lesson of ‘Tauktee’ Cyclone | Tauktae Cyclone: धडा ‘तौक्ते’ वादळाचा

Tauktae Cyclone: धडा ‘तौक्ते’ वादळाचा

googlenewsNext

-शैलेश माळोदे
(लेखक विज्ञान पत्रकार आणि हवामान बदल विषयांचे अभ्यासक आहेत.) 

आजकाल दरवर्षी वादळात मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि इतर प्रकारची हानी होणे ही पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील नित्याची बाब ठरत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही सार्वत्रिक उष्मा आणि हवामान बदलाच्या वास्तवाची सूचक आहे. त्यामुळे तौक्ते वादळाने दिलेल्या शिकवणीचा बोध करून घेणे गरजेचे आहे. कारण पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचा विचार करता, भविष्यकालीन खबरदारीच्या दृष्टीने ते अत्यावश्‍यकदेखील आहे. अरबी समुद्रातील वादळांचा  विचार करता हे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक संहारक वादळ होते, मुंबईपासून अवघ्या १४० किलोमीटरवरून हे वादळ सरकले हे बरे, अन्यथा महाआपत्ती ओढवली असती. २०१९ मध्ये डॉक्टर अ‍ॅडम सोबेल या शास्त्रज्ञाने केलेल्या एका अभ्यासानुसार, समुद्राची पातळी वाढल्यास वादळाच्या स्थितीत बदल घडून तिसऱ्या श्रेणीतील वादळाने मुंबईला फटका बसू शकतो. त्यांनी हवामान बदलाचे परिणाम म्हटले नसले तरी, धोका आहेच.

पुण्याच्या भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम)  शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते, तौक्ते वादळासंदर्भातील एक वेगळी बाब म्हणजे किनाऱ्यावर थडकल्यावरदेखील वादळी स्थिती पुढे १६ ते १८ तास टिकली. सागराकडून त्याला प्राप्त होणारी उष्णता आणि बाष्प मिळणारी प्रक्रिया सर्वसाधारणपणे वादळ किनाऱ्यावर थडकल्यावर थांबते आणि मग ते मंदावत जाते. परंतु यावेळी ही प्रक्रिया घडली नाही. परिणामी, ते वादळ दीर्घकाळ त्याच वादळी स्थितीत राहिले. 

एका कमकुवत स्थितीतील वादळाने जोर घेऊन अगदी कमी वेळात म्हणजे अवघ्या एका दिवसात पूर्ण वादळात रुपांतरित होणे आगळेच होते. त्याची गती तीही मुंबईलगतच्या क्षेत्रात वाढणे ही काळजीत टाकणारी बाब असून, वैज्ञानिक ज्याला ‘कंपाउंड इव्हेंट’ म्हणतात तशी ती स्थिती होती. एक तर वादळामुळे येणारे पाणी, त्यातच जोरदार पावसाची भर आणि त्याला हळूहळू वाढणारी सागराची पातळीची पार्श्वभूमी असा तिहेरी  फटका होता. परिणामी नेहमीपेक्षा जास्त क्षेत्रात पाणी भरले आणि ते तसेच राहिले. पाऊस अगदी राजस्थानच्या वाळवंटातही पडला.

अगदी अनपेक्षितरीत्या सागरी पृष्ठभागाचे तापमान वाढणे हाच ‘तौक्ते’ वादळाच्या कळीचा मुद्दा ठरला. पुण्यात हीच गोष्ट चक्रीवादळाच्या वाढत्या संख्येने जबाबदार असल्याचे पुन्हा तौक्ते संदर्भात अरबी सागरात दिसून आले. सध्या भारतीय किनारपट्टीच्या क्षेत्रात वाढत्या वादळाबरोबर अवर्षणातही वाढ होताना दिसून येत असल्याचे कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अ‍ॅन्ड वॅतेरचे अविनाश मोहंती यांचे म्हणणं आहे. अवर्षणे वादळांचे प्रमाण वाढविण्यासाठी पूरक भूमिका बजावतात असे ते म्हणतात. संस्थेच्या अहवालात देशातील ७५ टक्के जिल्हे वादळे, अवर्षणे आणि पुराच्या संकटात असल्याचे भविष्य वर्तवण्यात आलेल्या २००५ सालापासून चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या  जिल्ह्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. म्हणून मोहंतीच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा एकत्रितपणे प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मजबूत करणे, नागरिकांना आपत्ती दरम्यान काय करायचे ते नीट समजावून सांगणे, यासारख्या गोष्टींबरोबरच पायाभूत सेवांचे  संरक्षण करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत.

२०१५ साली मंजूर करण्यात आलेल्या देशातील चक्रीवादळ जोखीम निवारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीत बदलत्या आणि काळजीत टाकणाऱ्या ट्रेंड्सचाही विचार व्हायला हवा. हवामान बदलाचा धोका जास्त असलेल्या गुजरातसारख्या राज्यांमध्ये पायाभूत सेवा, उद्योग आणि लोकांच्या सुरक्षाविषयक उपायांमध्येदेखील वाढ व्हायला हवी. ती महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या संदर्भात, कोकणाच्या बाबतीतही तितकीच गरजेची आहे. अतिरेकी स्वरूपाच्या हवामान बदलाच्‍या घटना एकाच वेळी म्हणजे ‘कंपाउंड इव्हेंट’ ठरत अनेक पटींनी घातक ठरत आहेत. त्याविषयी विचार होऊन तयारी करायला हवी. किनारपट्टीचे पतन जतन करण्यासाठी धोक्यांचे प्रथम अध्ययन व्हायला हवे.

हवामान बदलामुळे अरबी समुद्र क्षेत्रात वादळांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. हवामान शास्त्रज्ञ हिरोयुकी मुराकामी यांनी २०१७ मध्ये प्रकाशित केलेल्या अध्ययनामुळे लक्षात आले की, अरबी समुद्रात विशेष करून गेल्या काही वर्षात निर्माण झालेली ६४% वादळे हवामान बदलाची परिणती आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आयपीसीसी या हवामान बदलविषयक संस्थेच्या अहवालानुसार उष्णदेशीय (ट्रॉपिकल) सागराचे म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे पृष्ठभागाच्या जवळील पाण्याचे तापमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास वादळी परिस्थिती निर्माण करणारे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. आज विज्ञानाने लक्षात आणून दिलेले हे ज्ञान तंत्रज्ञानाद्वारे सर्वव्यापी बनत असताना ‘तौक्ते’ वादळाची शिकवण विज्ञान संशोधनाकडे डोळस लक्ष पुरवून अंमलात आणावी लागेल नाही का? निदान विचार तरी व्हावा!

Web Title: Tauktae Cyclone: Lesson of ‘Tauktee’ Cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.