शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:02 IST2026-04-29T13:01:06+5:302026-04-29T13:02:18+5:30
Bacchu Kadu News: विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच आमदारकीसाठी पक्षाचं शिंदेसेनेत विलिनीकरण करण्याची अट शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान
विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच आमदारकीसाठी पक्षाचं शिंदेसेनेत विलिनीकरण करण्याची अट शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेची आमदारकी मला मिळणार असल्याचे मी प्रसारमाध्यमांमधून ऐकलं आहे. पण मला शिंदेंक़डून चर्चेसाठी बोलावणं आलेलं नाही. मात्र शेतकरी दिव्यांगांसाठी शिंदेसोबत जायला हरकत काय, असे म्हणत बच्चू कडू यांनी विधान परिषदेच्या आमदारकीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोतलाना बच्चू कडू म्हणाले की, आम्ही मुद्द्याची लढाई लढणारी माणसं आहोत. आमचे काही मुद्दे आहेत. आम्ही आमदारकीसाठी अजिबात जाणार नाही. दिव्यांगांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांची त्वरित पूर्तता झाली पाहिजे. कर्जमाफी, पगारवाढ यासह इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हमिभावाचा प्रश्न आहे. हमिभावासाठी एकनाथ शिंदे यांनी आमचा विचार केला. आमचाही प्रस्ताव आहे. आम्ही पदसाठी युती करणारे लोक नाही. पदासाठी, निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. बच्चू कडूची युती ही मुद्द्यावर आधारित असेल. मुद्दा असेल तर आम्ही पुढे पाऊल टाकू, असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, निव्वळ आमदारकीसाठी जावं एवढा बच्चू कडू नालायक नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा होईल. तसेच प्रहार ही किमान एक लाख सदस्य असलेली संघटना आहे. सुमारे ५ ते १० लाख दिव्यांग बांधव आमच्यासोबत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रचंड कष्टातून प्रहार ही संघटना निर्माण झालेही आहे. विलिनिकरणाच्या बातम्या वाचल्या तेव्हा दु:ख वाटलं. तसा मी जुना शिवसैनिकच होतो. शिवसेनेतील बंडखोरीतून प्रहारची निर्मिती झाली. शिवसेनेतून बाहेर पडून कुठल्या पक्षात न जाता २५ वर्षे लढणारा बच्चू कडू हा एकमेव असेल. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा आम्ही घेतलेला नाही. २ जागा आणि एक खासदारकी द्या म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंसोबत युती करू शकलो असतो, पण ते आम्ही केलं नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
मी नुकताच हिमालयातून पायी चालत आलो आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांमधून मला आमदारकीबाबत माहिती समजली. तसेच त्यानंतर माझं उदय सामंत यांच्यासोबत बोलणं झालं होतं. विधान परिषद उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांच्यापक्षाकडून कुठलाही फोन अथवा संदेश अद्याप आपल्याला मिळालेला नाही, असे कडूंनी सांगितले. तसेच विधान परिषधेच्या उमेदवारीबाबत विचारले असता तो किंतू परंतूचा विषय आहे. याबाबात चर्चा झाला पाहिजे. फक्त आमदार व्हायचं असतं, तर मी आताही हो म्हटलं असतं. एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद दिली, तर आम्ही त्यांचे पाईक बनून राहू. मेहनतीने लढू खूप काम, शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करू. मात्र आमदारकी असो वा विलिनीकरण असो त्याबाबत चर्चेशिवाय काही बोलू शकत नाही, असेही कडू यांनी सांगितले.