“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:27 PM2024-01-17T14:27:23+5:302024-01-17T14:30:22+5:30

Prakash Ambedkar On Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेतील सहभागाबाबत राहुल गांधी यांना पत्र लिहीत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

vba prakash ambedkar reaction over participation of congress rahul gandhi bharat jodo nyay yatra | “भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

Prakash Ambedkar On Bharat Jodo Nyay Yatra: खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून ६ हजार ७१३ किलोमीटर अंतर पार करून २० मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. इंडिया आघाडीतील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या यात्रेत सहभागी होण्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी या यात्रेत सहभागी होण्याबाबत एक अट ठेवली आहे. 

वंचित बहुजन आघाडीला राज्यातील महाविकास आघाडीत घेण्याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे म्हटले आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील समावेशाबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो न्याय यात्रेतील सहभागाबाबत अट ठेवली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...

भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी या यात्रेत सहभागी होण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इंडिया आघाडी सामील करून घ्या, तरच भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतो, अशी अट प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससमोर ठेवली आहे. तसे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना लिहिले आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलेय?

आपण आपल्या भारत जोड़ो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले याबद्दल आपले आभार. तथापि, मी या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करू इच्छितो की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही VBA ला अद्याप INDIA आघाडी अथवा मविआ मध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात आपण INDIA आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात, असे म्हटले आहे. सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, जे की संघटित शक्ती व कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

VBA अविरतपणे भाजप-RSSशी लढत आहे. VBA हा पक्ष केवळ ६ वर्षांचा असला तरी माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा वैचारिक लढा हा काही नवीन नाही. हा लढा म्हणजे मनुस्मृतीने संहिताबद्ध आणि टिकवून ठेवलेल्या हिंदू जाती व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. हा लढा आम्हाला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेला वारसा आहे, किंवा त्याहीपेक्षा त्यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. या सर्वांचा विश्वास होता की धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो आणि त्यांनी विविध धार्मिक विचारांचा पुरस्कार केला. आज आम्ही मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा आणि अर्थातच दलीत, आदिवासी व इतर भेदभावग्रस्त, उपेक्षित लोकांसाठी लढतो व त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या शेवटच्या भाषणातला काही भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी या नवीन गणराज्यासमोर येऊ शकणारी आव्हाने नमूद केली होती, आणि दुर्दैवाने ती भीती खरी होताना दिसत आहे.

.. जर राजकीय पक्षांनी देशापेक्षा जातीला जास्त महत्त्व दिले, तर देशाचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल, आणि कदाचित ते आपण कायमचे गमावून बसू. या परिणामापासून आपण सर्वांनी दृढनिश्चय करून बचाव केला पाहिजे. शेवटपर्यंत आपले स्वातंत्र्य वाचवण्याची आपली तयारी असली पाहिजे. आपली ही राजकीय लोकशाही आपल्याला सामाजिक लोकशाही सुद्धा करावी लागेल. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर अशी जीवन पद्धत जी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांना जीवनाची तत्व म्हणून स्वीकार करेल. ही तत्त्व त्रिरत्नतील वेगवेगळी सूत्र मानली जाऊ नये.

बाबासाहेबांचा संदेश, जो वारसा आम्हाला शिकवण म्हणून मिळाला आहे, तो अगदी सोपा आहे. सामाजिक लोकशाही, जी स्वातंत्र्य, समता, बंधुतेला मान्य करेल. माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचेही तुम्हाला हेच सांगणे आहे. जात, धर्म, पंथाला देशापेक्षा वर ठेवणाऱ्या भाजप आरएसएस शी आपल्याला लढायचे असेल, तर काँग्रेसने  सामाजिक लोकशाहीचा अजेंडा पुढे करावा. केवळ शब्दांनीच नव्हे कृती कार्यक्रमातूनही. सवर्ण केंद्रित राजकारण सामाजिक लोकशाहीला हानिकारक आहे. 

आपल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मी सशर्त स्वीकारत आहे. दीर्घ प्रतिक्षित INDIA आघाडी व मवीआ मध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रित येत नाही, तोपर्यंत या यात्रेत सहभागी होणे माझ्यासाठी अवघड आहे. हे निमंत्रण नसताना तुमच्या यात्रेत सहभागी झाल्यास युती झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागतील, जी अजून झालेलीच नाही, आणि या सर्वाचे नकारात्मक परिणाम होतील. तथापि आपण VBA ला INDIA आघाडी तसेच मवीआ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे असे आमचा आग्रह आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.
 

Web Title: vba prakash ambedkar reaction over participation of congress rahul gandhi bharat jodo nyay yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.