मंत्री नितेश राणेंच्या निधीवाटपावरील विधानावर उद्धवसेना आक्रमक; थेट राज्यपालांना लिहिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:12 IST2026-02-04T15:12:06+5:302026-02-04T15:12:55+5:30
ही विधाने केवळ राजकीय वक्तव्य नसून सार्वजनिक पदाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आर्थिक दबाव टाकल्याची उघड कबुली आहेत असं अखिल चित्रे यांनी म्हटलं.

मंत्री नितेश राणेंच्या निधीवाटपावरील विधानावर उद्धवसेना आक्रमक; थेट राज्यपालांना लिहिलं पत्र
मुंबई - राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यात मंत्री नितेश राणे यांनी एका प्रचारसभेत सरकारी निधीचा उल्लेख करत राजकीय दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून नितेश राणे यांनी मंत्रिपदाची आणि लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करून ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सरकारी निधीद्वारे राजकीय दबाव टाकल्यामुळे घटनात्मक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.
अखिल चित्रे यांनी पत्रात लिहिलंय की, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा राज्य संघटक या नात्याने अत्यंत गंभीर, घटनाविरोधी आणि लोकशाहीच्या मूलतत्वांना धक्का देणारी बाब निदर्शनास आणून देतोय. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी जाहीरपणे आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सगळे सरपंच आमचे झाले. कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह दिसले की लगेच निधी देतो पण मशाल चिन्ह निघाले तर असलेला निधीही कमी करतो असं म्हटलं. ही विधाने केवळ राजकीय वक्तव्य नसून सार्वजनिक पदाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आर्थिक दबाव टाकल्याची उघड कबुली आहेत. मंत्रिपदाच्या व लोकप्रतिनिधी शपथेचा भंग आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच भारतीय संविधानाच्या तिसन्या अनुसूचीप्रमाणे प्रत्येक मंत्री व लोकप्रतिनिधी शपथ घेती की ती, 'संविधानाशी निष्ठा राखेत, कोणताही पक्षपात न करता कर्तव्य पार पाडेल, पदाचा वापर लोकहितासाठीच करेल. परंतु वरील विधानांमधून संबंधित मंत्र्याने सरकारी निधीचा वापर पक्ष, चिन्ह व राजकीय निष्ठेनुसार करण्यानी भूमिका घेतली, लोकांनी निवडून दिलेल्या स्थानिक प्रतिनिधीना आर्थिक धमकीद्वारे निष्ठा बदलण्यास भाग पाडले आणि त्यामुळे मंत्रिपदाच्या तसेच लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेल्या शपथेचा उघड भंग केला आहे. हे वर्तन म्हणजे संविधानानुसार मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग असून, मंत्रिपदाच्या पवित्रतेला धक्का देणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही बाब एकदाच घडलेली नसून नितेश राणे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात याआधी देखील अशा स्वरूपाची भाषा, वागणूक व सतेचा वापर केल्याचे प्रसंग सार्वजनिकरीत्या समोर आलेले आहेत असंही अखिल चित्रे यांनी सांगितले.
कॅबिनेट मंत्री श्री. नितेश नारायण राणे यांच्या सार्वजनिक विधानांमधून मंत्रीपदाच्या व लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग झाल्याचा गंभीर मुद्दा मा. राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून देत आहे.
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) February 3, 2026
ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सरकारी निधीच्या आधारे राजकीय दबाव टाकणे हे… pic.twitter.com/Jjw3DvXz27
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत घटनात्मक हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांकडून तातडीचा आणि लेखी अहवाल मागवावा. मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या निधीमध्ये राजकीय पक्षपात झाला आहे का याची चौकशी व्हावी. भविष्यात अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर होऊ नये यासाठी संवैधानिक मार्गदर्शन व निर्देश द्यावेत अशी मागणी उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी केली आहे.