एसटी ५९१ कोटींनी खड्ड्यात; दैनंदिन खर्चही ३३ कोटींवर, तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, परिवहन मंत्र्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:28 IST2026-04-16T09:27:27+5:302026-04-16T09:28:33+5:30
ST Bus News: एसटीला दररोज सरासरी १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत असल्याने तो कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.

एसटी ५९१ कोटींनी खड्ड्यात; दैनंदिन खर्चही ३३ कोटींवर, तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, परिवहन मंत्र्यांची सूचना
मुंबई - राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला २०२५-२६ या आर्थिक वर्षांत ५९१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. दररोज सरासरी १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत असल्याने तो कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.
एसटीच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सरनाईक बोलत होते. येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिक कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. दररोज होणारा दीड ते दोन कोटी रुपयांचा तोटा भरून काढणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, असे ते म्हणाले. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून कारणांचा अभ्यास करावा आणि त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. सातत्याने तोट्यात असलेल्या विभागांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सक्षम नेतृत्व आवश्यक
नागपूर विभागात गेल्या दोन वर्षांपासून तोटा होत असल्याबद्दल सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करत, अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर प्रभावी नियंत्रण राहात नसल्याचे त्यांनी नमूद केले. अशा अधिकाऱ्यांना पर्यायी पदस्थापना देऊन सक्षम नेतृत्व देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक सक्षमतेसाठी प्रशासनिक शिस्त, जबाबदारीची निश्चिती यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाढता तोटा चिंताजनक
जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे आठ विभाग नफ्यात होते. मात्र, उर्वरित २३ विभागांपैकी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या प्रमुख विभागांचा वाढता तोटा चिंतेचा विषय असल्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.