नवी दिल्ली - पश्चिम आशियातील संघर्षाचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून, मार्च २०२६ मध्ये घाऊक महागाई ३.८८ टक्क्यांवर पोहोचली आहे. हा दर गेल्या ३८ महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. इंधन, वीज आणि उत्पादन क्षेत्रातील किमतींमध्ये झालेल्या झपाट्याने वाढीमुळे महागाईने सलग पाचव्या महिन्यात वाढ नोंदवली.
सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये हा दर २.१३ टक्के होता, तर गेल्या वर्षी मार्चमध्ये तो २.२५ टक्के इतका होता. अन्नधान्याच्या किमतीत काहीशी घट झाली असली तरी, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
सरकारने काय केले?
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात केली होती.
तुमच्यावर काय होतो परिणाम?
घाऊक महागाई दीर्घकाळ वाढत राहिल्यास उत्पादन क्षेत्रावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. उत्पादक हा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकतात.
महागाईमध्ये विविध घटकांचा जास्त वाटा असतो. यातील दरवाढीचा परिणाम पुढे जाऊन सर्वसामान्यांच्या खर्चावरही दिसून येतो.
कच्च्या तेलाचा फटका
तेल दरवाढीवा परिणाम इंधन, वीज बास्केटवर झाला असून, या क्षेत्रातील महागाई १.०५ टक्क्यांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कच्च्या पेट्रोलियममधील महागाई ५१.५७ टक्क्यांपर्यंत उसळली आहे.
भाजीपाला स्वस्त, पण...
भाजीपाल्याने मात्र थोडा दिलासा दिला. फेब्रुवारीत भाजीपाल्याचा महागाई दर ४.७३ टक्के होता, जो मार्चमध्ये कमी होऊन १.४५ टक्क्यांवर आला आहे. मात्र, धातू व इतर उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
