अंदमानात मृत्यू झालेले सर्वच ‘स्वातंत्र्यवीर’ फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:49 IST2026-04-15T09:48:56+5:302026-04-15T09:49:51+5:30
Court News: अंदमानच्या कारागृहात विनायक सावरकर यांच्या बरोबर जवळपास ५६८ इतर क्रांतिवीरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हालअपेष्टा सहन केल्या. काही क्रांतिकारकांचा अंदमान कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनादेखील स्वातंत्र्यवीर म्हणता येईल का? या बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर, माझ्या दृष्टीने सर्व क्रांतिकारक समान आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

अंदमानात मृत्यू झालेले सर्वच ‘स्वातंत्र्यवीर’ फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे स्पष्टीकरण
पुणे - अंदमानच्या कारागृहात विनायक सावरकर यांच्या बरोबर जवळपास ५६८ इतर क्रांतिवीरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हालअपेष्टा सहन केल्या. काही क्रांतिकारकांचा अंदमान कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनादेखील स्वातंत्र्यवीर म्हणता येईल का? या बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर, माझ्या दृष्टीने सर्व क्रांतिकारक समान आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे क्रांतिकारकांच्या योगदानाबाबत व्यापक चर्चा रंगत आहे.
माझ्या दृष्टीने सर्वच क्रांतिकारक समान
अंदमानमध्ये जे इतर क्रांतिकारक होते, त्यांना स्वातंत्र्यवीर न म्हणणे आणि सावरकर यांनाच स्वातंत्र्यवीर म्हणजे हे समानतेच्या विरोधात नाही का? या उपप्रश्नावर, माझ्या दृष्टीने सर्वच क्रांतिकारक समान आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे सर्व क्रांतिकारांना महात्मा, स्वातंत्र्यवीर, लोकमान्य, क्रांतिकारक, क्रांतिवीर, नेताजी म्हणण्यास माझा आक्षेप नाही, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी मार्च २०२३मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते.
त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे.
राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. या प्रकरणात उलट तपासणीदरम्यान ॲड. पवार यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. खटल्याची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.