“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:30 IST2025-06-10T13:28:30+5:302025-06-10T13:30:35+5:30
Sanjay Raut News: सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. धर्मांध, महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
Sanjay Raut News: अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. आताच्या घडीला ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेच्या हातात गोष्टी आहेत. राहुल गांधी यांच्या लेखामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेकांना मिरच्या झोंबलेल्या आहेत. यंत्रणांचा वापर करून तुम्ही निवडणुका जिंकल्या आणि आमचे पक्ष फोडले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष बुडबुडे आहेत. हे बुडबुडे लवकरच फुटतील. मुख्य म्हणजे मोदी आणि शाह यांच्या भ्रमाचा भोपळा दररोज फुटत आहे. तुम्ही कितीही खोटे बोला, रेटून बोला. प्रेसिडेंट ट्रम्प यांना तुम्ही अद्यापही उत्तर देऊ शकत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, धर्मांध, जातीय आणि महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत अजित पवार गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार कोणत्या मोठ्या क्रांतिकारी विचारांनी गेलेले नाहीत. भाजपाचा विचार हा शहीद भगत सिंग, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही. लुटा, खा आणि वाटा, हाच त्यांचा विचार आहे. सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांची ६० वर्षांहून अधिक काळ राजकारणात काम केले
शरद पवार यांची विचारधारा ही फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांचा विचार पुढे घेऊन जाणारी आहे. हाच विचार घेऊन शरद पवार यांची ६० वर्षांहून अधिक काळ राजकारणात काम केले. सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत. त्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील, याविषयी माझ्या मनात शंका आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता, देशद्रोहाचे आरोप लावले, भ्रष्टाचाराचे आरोप लावले, चुकीचे आरोप लावले, यावरूनच सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी तुमचे राजकारण किती खालच्या पातळीवर आले, हे दिसत आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट आज त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही. त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. मी आत्ताच भारतात आले आहे. १४ दिवस परदेशात होते. त्यानंतर दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.