किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’ करणाऱ्यांना रेल्वेचा दणका; ४९५ जण दोषी, लाखोंचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:37 IST2026-02-26T17:35:54+5:302026-02-26T17:37:19+5:30
Alarm Chain Pulling Cases: किरकोळ किंवा अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन ओढण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’ करणाऱ्यांना रेल्वेचा दणका; ४९५ जण दोषी, लाखोंचा दंड वसूल
Alarm Chain Pulling Cases: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबावी किंवा तसे संकेत चालकाला मिळावेत, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक डब्यात एक साखळी देण्यात आलेली असते. ही साखळी ओढली की, त्या माध्यमातून रेल्वे चालकाला आपत्कालीन परिस्थितीचा संदेश किंवा संकेत जातो. बऱ्याचवेळा साखळी ओढल्याने ब्रेक लागून ट्रेन थांबते. रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या या सोयीचा अनेक प्रवासी गैरफायदा घेतानाही दिसतात. किरकोळ कारणांवरून साखळी ओढणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने दणका दिला असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अलीकडील काळात ‘अलार्म चेन पुलिंग’ (ACP) चा वापर अनेक वेळा चुकीच्या व विविध कारणांसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारणांमध्ये चुकून चेन ओढणे, प्रवासी वेळेत गाडीमध्ये चढू न शकल्यामुळे चेन ओढणे, मोबाइल फोन खाली पडणे किंवा इतर किरकोळ स्वरूपाची कारणे समोर आली आहेत. एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी ‘अलार्म चेन पुलिंग’चा गैरवापर केल्यास शेकडो प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
अलार्म चेन पुलिंगचे एकूण ४९५ प्रकरणे
उपलब्ध माहितीनुसार, भुसावळ विभागात अलार्म चेन पुलिंग घटनांवर लक्ष ठेवले जाते. डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नोंदवलेली अलार्म चेन पुलिंगचे एकूण ४९५ प्रकरणे समोर आली. त्यात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या ४२६ आणि वसूल करण्यात आलेल्या दंड एकूण १ लाख ४३ हजार २०० रुपये आहे. विविध ट्रेनमध्ये ही कारवाई झाल्याचे समजते.
दरम्यान, अलार्म चेन ओढण्याचा गैरवापर करणे हे रेल्वे कायदा कलम १४१ अंतर्गत गुन्हा आहे. प्रवाशांनी किरकोळ किंवा अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन ओढण्याचे प्रकार टाळावेत, अन्यथा त्यामुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.