सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:12 IST2025-07-15T15:11:00+5:302025-07-15T15:12:38+5:30
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar News: महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar News: महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके-४७ आणि टॉमी गन यांसारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत. भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे. असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली? सरकार त्यांच्यावर 'अर्बन नक्षल' म्हणून कारवाई करणार आहे की नाही?" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या शस्त्रपूजेच्या फोटोंवर विरोधी पक्ष ही शांत आहे, अशी टीका प्रकाश आंबडेकर यांनी केली.
जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही
ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत, त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही? कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे. परंतु, एके-४७ आणि टॉमी गन यांसारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे. आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगत आहे, त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही. लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही नौटंकी आहे, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
सरकार नेमके कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे?
कामगारांच्या मोर्च्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का? खाजगी सावकाराच्या विरोधात कारवाई करा, ही मागणी केल्यावर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार का? सरकार नेमके कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ज्याच्याकडे शस्त्र, दारुगोळा आहे, त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकतात कारण, बेकायदेशीर मार्गाने तो राज्याला उलथू पाहतोय. बेकायदेशीर मार्गाने राज्य उलथवणाऱ्यांकडे शस्त्र, दारुगोळा आहे की नाही ते तपासले पाहिजे. शस्त्र, दारुगोळा आरएसएसवाल्यांकडे आहेत. त्यांनी सार्वजनिकरित्या ती जाहीर केली आहेत. त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाची कारवाई करणार आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र, दारुगोळाची मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस पूजा करताय याविरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली तर त्या माणसाच्या मागे या सर्व राजकीय विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने विरोधक आहेत, हे दिसेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे 'अघोषित आणीबाणी' आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे.
वंचित… pic.twitter.com/3s0ztqliU0— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 15, 2025