मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करायच्या नाहीत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
दरवर्षी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येऊ शकतील, अशी तरतूद बदली कायद्यामध्ये आहे; मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या वर्षी १५ टक्केच बदल्या करण्यास अनुमती देण्यात आली होती; मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत बदल्या करायचा नाहीत, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर यंदाही निर्बंध येणार, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.
केवळ तीनच स्थितीत होणार बदल्या- आजच्या आदेशानुसार विनंती बदल्यादेखील होणार नाहीत, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. - सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे, कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवांतील रिक्त पदे भरणे तसेच शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बदली करणे आवश्यक असल्याची विभागप्रमुखांची खात्री पटली तर अशा तीनच परिस्थितीत बदल्या करण्यात येतील.