“कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र प्रश्न पडतो”; भोंदू अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:18 IST2026-03-23T12:16:43+5:302026-03-23T12:18:57+5:30

Raj Thackeray Reaction On Ashok Kharat Case: महाराष्ट्राचे किती अधःपतन झाले आहे याचे हे द्योतक आहे. हे सगळे घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून केला आहे.

mns chief raj thackeray first reaction on the fraudster ashok kharat case | “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र प्रश्न पडतो”; भोंदू अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया

“कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र प्रश्न पडतो”; भोंदू अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray Reaction On Ashok Kharat Case: अनेक महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटकेची कारवाई केलेला भोंदू अशोक खरात पोलीस कोठडीत आहे. भोंदू आणि विकृत अशोक खरात याच्या अघोरी व संशयास्पद कारवायांचा भांडाफोड त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच  झाल्याचे वृत्त आहे. खरात बाबाच्या स्त्री लंपटपणाविषयी तक्रारी कानावर येऊ लागल्यानंतर त्याचा संशय बळावला. त्यातून त्याने बाबाच्या दालनात स्पाय कॅम बसवले आणि त्यात बाबाचे विकृत चाळे कैद केल्याचे आता पुढे येत आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे

ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे

हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ?

या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच. पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. 

जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग...

राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा

मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे. ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्स राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Web Title : राज ठाकरे ने अशोक खरात मामले की निंदा की, महाराष्ट्र के पतन पर सवाल

Web Summary : राज ठाकरे ने अशोक खरात मामले की आलोचना की, जिसमें महिलाओं के शोषण और राजनीतिक संरक्षण पर प्रकाश डाला गया। उन्होंने महाराष्ट्र के पतन पर सवाल उठाया, जहां नेता तर्क के बजाय अंधविश्वास को प्राथमिकता देते हैं। ठाकरे ने गहन जांच का आग्रह किया, शोषण की निंदा की और पीड़ितों के लिए न्याय की मांग की, सत्ता में बैठे लोगों को जवाबदेह ठहराया।

Web Title : Raj Thackeray Slams Ashok Kharat Case, Questions Maharashtra's Deterioration

Web Summary : Raj Thackeray criticizes the Ashok Kharat case, highlighting the exploitation of women and political patronage. He questions Maharashtra's decline, where leaders prioritize superstition over reason. Thackeray urges a thorough investigation, condemning the exploitation and demanding justice for the victims, holding those in power accountable.