जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 20:20 IST2026-03-16T20:19:32+5:302026-03-16T20:20:33+5:30
Maharashtra Assembly Budget Session 2026: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला.

जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी केली. अखेरीस आव्हाड यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.
आज विधान सभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला आपला विरोध दर्शवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उदाहरण देत काही वक्तव्य केलं. आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला. शिंदेसेनेचे आमदार आणि मंत्री दादा भुसे, तसेच भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली.
सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेला उल्लेख सभागृहाच्या कामकाजामधून काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच जितेंद्र आव्हाड यांना माफी मागण्याची स्पष्ट सूचना दिली. त्यानंतर मी माफी मागतो असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी या विधानाबाबत सभागृहाची माफी मागितली.