दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन हे पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 16:59 IST2020-12-25T16:20:54+5:302020-12-25T16:59:54+5:30
देशात कृषी कायद्याविरोधात नाराजी नाहीच..

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन हे पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने : चंद्रकांत पाटील
पुणे : देशातील मूठभर शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत.जर सर्व शेतकऱ्यांना कृषी कायदा अन्यायकारक वाटला असता तर देशभर आंदोलन झाले असते. परंतु, दिल्लीच्या सीमेवरील शेतकरीआंदोलन हे पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करा असे अनेकदा म्हणताहेत तरीही महिनाभर त्रास दिल्यावर मोदी यांच्या पेशन्सची कमाल लोकांना भावली, असे कौतुकोद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.
भूगाव येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचाही संदर्भ दिला.
पाटील म्हणाले , देशात कृषी कायद्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. कारण दिल्ली वगळता देशभरात मध्यप्रदेश,कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आंध्र प्रदेश अशा कुठेही शेतकरी आंदोलन करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणीही रस्त्यावर उतरले नाहीत. देशभरातील शेतकरी कधीच रस्त्यावर नव्हता आणि आता तो यापुढे या कायद्याविरोधात उतरणारही नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त करतानाच पंजाबमधील शेतकऱ्यांचा गैरसमज केला जातोय. दिल्लीतील आंदोलनापाठीमागे राजकीय स्वार्थ दडलेला आहे हे ज्यांच्या लक्षात आले आहे ते आता तिथून पळ काढत आहे.
दुटप्पीपणा हा काँग्रेसचा पहिल्यापासून स्थायीभाव
दुटप्पीपणा हा काँग्रेसचा पहिल्यापासून स्थायीभाव आहे.शेतकरी, मराठा आरक्षण, ओबीसी, धनगर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते हे ठरवून वेगवेगळे भाष्य करत गैरसमज निर्माण करण्याचे काम करणे हा तर त्यांचा धंदाच आहे, अशी टीका देखील पाटील यांनी यावेळी केली.