धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; २१ तारखेला मुंबईत करणार होते आंदोलन
By प्रविण मरगळे | Updated: January 17, 2026 19:04 IST2026-01-17T19:03:32+5:302026-01-17T19:04:45+5:30
धनगर समाजाच्या आंदोलकांनी सरकार आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बोऱ्हाडे यांच्या अटकेचा निषेध केला.

धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; २१ तारखेला मुंबईत करणार होते आंदोलन
जालना - धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज जालन्यातून ते अहिल्यानगरच्या चौंडीला जाणार होते. त्यानंतर २१ तारखेला बोऱ्हाडे मुंबईत येणार होते. मात्र त्याआधीच जालना येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. हजारो आंदोलकांसह दीपक बोऱ्हाडे मुंबईत धनगर समाजाच्या आंदोलनासाठी येणार होते. मात्र आझाद मैदान पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यानंतर आज जालना पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील दीपक बोऱ्हाडे यांच्या घरी जात त्यांना ताब्यात घेतले.
या घटनेची माहिती मिळताच धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकांनी सरकार आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बोऱ्हाडे यांच्या अटकेचा निषेध केला. जालना शहरातील विविध भागातून कार्यकर्ते जमा होत आहेत. पोलीस जेव्हा दीपक बोऱ्हाडे यांना ताब्यात घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी फेसबुक व्हिडिओ करत सरकारवर टीका केली. दीपक बोऱ्हाडे म्हणाले की, माझ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी का अटक केली, मला अटक का करतायेत हे सांगावे. पोलीस आणि शासनाची भूमिका जोवर येत नाही तोवर मी माझी भूमिका सांगत नाही. कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था पाळावी. कुणीही रस्त्यावर येऊ नये. जनतेला त्रास होईल असं कुणी वागू नका असं त्यांनी आवाहन केले.
तसेच सकाळपासून मी जिथे राहतोय त्या कॉलनीत पोलीस तैनात आहेत. या घरात कुणी आतंकवादी आहे का? राज्यातल्या प्रत्येक बांधवांना सांगतो, शांतता राखावी. आपले आंदोलन संविधानिक मार्गाने सुरू आहे. कॉलनीत पोलिसांचा फौजफाटा लावला आहे असंही दीपक बोऱ्हाडे यांनी विचारले. बोऱ्हाडे यांना ताब्यात घेतल्यानंतर बीडमध्येही कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. मेंढरासह, घोड्यासह आम्ही धनगर समाज मुंबईत येणार, धनगर समाजाचा प्रश्न ७५ वर्षाचा आहे. एसटी आरक्षण प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावे ही आमची मागणी आहे असं आंदोलकांनी केली.
दरम्यान, धनगर समाजाच्या आंदोलनासाठी बीड, जालना आणि मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईत येणार आहेत. दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. आमच्या हक्काचे एसटी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जालनाच्या प्रत्येक चौकात पोलीस प्रशासन आहे. धनगर समाजाचा प्रश्न निकाली काढू असं बारामतीत सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही. धनगर समाज आता पेटून उठला आहे. आझाद मैदानावर गेल्यावर आरक्षण मिळते हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवले. धनगर समाजाचा केवळ मतांपुरता वापर करून घेतला जातो. मात्र आता समाज जागा झाला आहे. आम्ही पण २ लाख मेंढ्या मुंबईत नेणार आहे असं धनगर समाजाचे नेते वाघमोडे महाराज यांनी म्हटलं.