“कोकण आता थांबणार नाही, महामार्ग-ग्रोथ सेंटर्स उद्योगात राहणार अग्रेसर”; DCM शिंदेंचा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:30 IST2026-02-04T12:29:02+5:302026-02-04T12:30:48+5:30
Deputy CM Eknath Shinde News: आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर कोकणाच्या भविष्याचा आहे. आम्ही घोषणा करून थांबत नाही, प्रकल्प जमिनीवर उतरवतो, असे एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

“कोकण आता थांबणार नाही, महामार्ग-ग्रोथ सेंटर्स उद्योगात राहणार अग्रेसर”; DCM शिंदेंचा शब्द
Deputy CM Eknath Shinde News: कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभे राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिले. हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग आहे. जो रोजगार, उद्योग आणि समृद्धी थेट गावागावात घेऊन येणार आहे, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरात झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या प्रकल्पांची आक्रमक भूमिका मांडत विकासाचा थेट अजेंडा समोर ठेवला. सागरी मार्ग आणि कोस्टल रोडच्या कडेला उभारण्यात येणारी ११ ग्रोथ सेंटर्स ही कोकणाच्या अर्थव्यवस्थेची नवी इंजिनं ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या केंद्रांमुळे हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार असून, नोकरीसाठी गाव सोडण्याची वेळ येणार नाही. मत्स्य उद्योग, काजू, नारळ, आंबा प्रक्रिया उद्योगांना विशेष पॅकेज देऊन स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजाराशी जोडण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
‘ग्लोबल व्हिलेज’ संकल्पना राबवली जाणार
कोकणाच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने पूर्ण वापर करून ‘ग्लोबल व्हिलेज’ संकल्पना राबवली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. बीच कनेक्टिव्हिटी, पर्यटन हब, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देऊन कोकणाला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दाभोळ खाडीवरील पूल, रस्ते, ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना आणि ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांचं मजबूत जाळं उभं केलं जात असल्याचाही त्यांनी आढावा घेतला. एमएसआरडीसीमार्फत रस्ते, सागरी मार्ग आणि कोस्टल कनेक्टिव्हिटीला गती देण्यात येत असून, त्यामुळे उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर कोकणाच्या भविष्याचा
आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर कोकणाच्या भविष्याचा आहे. आम्ही घोषणा करून थांबत नाही, प्रकल्प जमिनीवर उतरवतो, असे ठामपणे सांगत शिंदे यांनी महायुती सरकारचा विकासाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत महायुतीची सत्ता आल्याशिवाय हे ‘गेम चेंजर’ प्रकल्प पूर्ण ताकदीने राबवता येणार नाहीत, असं सांगत त्यांनी मतदारांना थेट आवाहन केले. शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं कौतुक करत म्हटले की, हा जिल्हा केवळ रत्नांची खाण नाही, तर देशाला भारतरत्न देणारी भूमी आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कोकण कष्टकरी, बुद्धिमान आणि लढवय्या माणसांचा प्रदेश आहे. रत्नागिरीकर फसवणूक सहन करत नाहीत, योग्यवेळी योग्य ठिकाणी उत्तर देतात, असंही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात ३० लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे. यातील अनेक उद्योग कोकणात येणार असून, त्यामुळे स्थानिक तरुणांना आपल्या गावातच रोजगार मिळेल. कोकणातील तरुणाला कामासाठी गाव सोडावे लागणार नाही, हेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री असताना राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये ५०% सवलत, शेतकरी सन्मान योजना, पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वार्षिक १२,००० रुपयांची मदत दिली असल्याचे सांगितले.