Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 22:03 IST2019-11-13T21:58:40+5:302019-11-13T22:03:09+5:30
राष्ट्रपती राजवट लागू नये ही भाजपची इच्छा होती. मात्र, दोन्ही प्रादेशिक पक्षांत अंतर निर्माण झाल्याने समज-गैरसमज झाल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याला शिवसेनेला जबाबदार धरणे योग्य नाही.

Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार?
माढा : अवघ्या चारच महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात जाणाऱ्या उदयनराजेंना पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंचे राज्यात किंवा केंद्रात पुनर्वसन करण्याचा विचार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू झाला असून याबाबतचे मोठे वक्तव्य माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
राष्ट्रपती राजवट लागू नये ही भाजपची इच्छा होती. मात्र, दोन्ही प्रादेशिक पक्षांत अंतर निर्माण झाल्याने समज-गैरसमज झाल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याला शिवसेनेला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे, भाजपचे राजकुमार पाटील, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव राजाभाऊ चवरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कुबड्यावरील हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे आकलन माझ्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच चांगले आहे. त्यामुळे शिवसेनेने महायुतीच्या जनमताचा आदर करून भाजप सोबत सरकार स्थापण्यास एक पाऊल पुढे टाकल्यास निश्चित महायुतीचे सरकार बनेल. सेना-भाजप हे घरातील भांडण असून हे लवकरच मिळेल, असा आशावाद माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
याचबरोबर त्यांनी उदयनराजेंबाबतही भाष्य केले. माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेत पुनर्वसन करण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार राज्यात पद मिळाले नाही तर राज्यसभेचे सदस्यत्व उदयनराजेंना मिळण्याची शक्यता आहे.
उदयनराजेंबाबत सांगताना त्यांनी मोहिते-पाटील कुटुंबीयांचे देखील एप्रिल महिन्यापर्यंत पुनर्वसन केल्याची बातमी ऐकायला मिळेल, असे सुतोवाच केले.