“मी मंत्रालयात येणार नाही, अधिवेशन घेणार नाही; माझ्या पक्षाविषयी बोललात तर…”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 03:26 PM2021-11-28T15:26:51+5:302021-11-28T15:28:15+5:30

सरकारचे निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते. सरकारची वाटचाल असनदशीर मार्गवरची आहे अशी टिका आमदार आशिष शेलार यांनी केली.

BJP Ashish Shelar Target CM Uddhav Thackeray | “मी मंत्रालयात येणार नाही, अधिवेशन घेणार नाही; माझ्या पक्षाविषयी बोललात तर…”

“मी मंत्रालयात येणार नाही, अधिवेशन घेणार नाही; माझ्या पक्षाविषयी बोललात तर…”

Next

मुंबई - अहंकार तर या सरकारच्या ठायी ठायी भरलेला आहे. मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही, माझ्यापक्षा विषयी बोललात तर मुंडण करू. केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन. असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले हे सरकार आहे अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

आशिष शेलार(BJP Ashish Shelar) म्हणाले की, या सरकारमध्ये सामान्य माणसाचे भले झाले नाही. अहंकार,अतर्क,असंवेदनशील कार्यपद्धती सरकारची दोन वर्षे राहिली. पेट्रोल वरील कर कमी करा अशी मागणी केली तर विदेशी दारुवरील कर कमी केला. वायनरीला सबसिडी दिली पण शेतकऱ्यांबाबत काही बोलायला तयार नाही. २० वर्षापुर्वीच्या कार्यक्रमाचा एका एजन्सीला पैसा दिला गेला पण एसटीच्या कामगाराला द्यायला तयार नाही. रयत  शिक्षण संस्थेला करोडो दिले जातात, आमचा विरोध नाही, पण शाळांना अनुदान दिले जात नाही. शाळा बंद मात्र फी वाढवली जाते. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचे बंद केले जाते. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानाचा हक्क काढून घेतला जातो लोकशाहीला मारक असे हे निर्णय का घेतले जातात? हे सगळे तर्कात न बसणारे आहे असंही त्यांनी सांगितले.

तसेच १६ हजार ग्रामपंचायत प्रशासक म्हणून स्वतः ची लोक बसवण्याचा डाव सरकारचा होता, पण हा डाव न्यायालयाने फेटाळला. ''कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांची काय सोय केली,'' असे म्हणत न्यायालयानं सरकारला फटकारलं.  प्रतिज्ञापत्रच स्विकारल नाही. अंतिम वर्षे परिक्षा न घेण्याच्या निर्णयावरुन ही सरकारला न्यायालयाने फटकारुन परिक्षा घ्यायला लावल्या. पीएमआरडीच्या थेट नियुक्ती रद्द करुन निवडणूक घ्यायला लावली, अशा असंख्य निर्णयात न्यायालयाने सरकारला धारेवर धरलं. कधी निर्णय रद्द केले, कधी मागे घ्यायला लावले, कधी कान उघडणी केली. सरकारचे निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते. सरकारची वाटचाल असनदशीर मार्गवरची आहे अशी टिका आमदार आशिष शेलार यांनी केली.

सरकार असंवेदनशील

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ५० हजार देऊ म्हणणारे १० हजारांची घोषणा केली तेही देऊ शकले नाहीत. एफआरपीसाठी आंदोलने झाली पण हे सरकार तीन टप्प्यात एफआरपी नको म्हणते, कोरोना काळात देशाचे अर्थचक्र ज्या शेतकऱ्यांनी चालवले त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली जात आहे. महिला अत्याचाराच्या बाबतीत तर अत्यंत असंवेदनशील पणा दिसतो. गेल्या सात महिन्यात मुंबईत ५५० बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेलेत. शक्ती कायदा कुठे आहे? असा सवाल भाजपाने विचारला आहे. मराठा समाजाचे आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. भूमिका काय? ओबीसी राजकीय आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. सरकार काय करणार? अशा प्रत्येक आघाडीवर सरकार असंवेदनशील वागतेय या आमच्या वेदना आहेत. असंही शेलार म्हणाले.

Web Title: BJP Ashish Shelar Target CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.