लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, e-KYC बद्दल अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 22:21 IST2026-01-20T22:18:45+5:302026-01-20T22:21:55+5:30
Ladki Bahin Yojana Update in Marathi: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांना पैसे मिळाले नसल्याचा प्रकार राज्यभरातून समोर आला आहे. याबद्दल आता अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, e-KYC बद्दल अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाल्या...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने राज्यभरात महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक महिलांना पैसेच मिळाले नाही. ई-केवायसी करताना त्रुटी राहिल्यामुळे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरूस्त करण्याबद्दल राज्यातील महिलांना माहिती दिली.
अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती."
अदिती तटकरेंनी ई-केवायसीबद्दल काय सांगितले?
पुढे अदिती तटकरे यांनी यांनी सांगितले की, "तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत", अशी माहिती तटकरे यांनी दिली.
जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला. मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी आता महिला आंदोलन करत आहेत. अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी, नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला आहे.
दुरुस्तीचा पर्यायच उपलब्ध नव्हता
एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर किंवा ई-केवायसी पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणताही एडीट किंवा करेक्शनचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. ही सर्वात मोठी तांत्रिक अडचण ठरली असून, चुकीच्या माहितीमुळे एकदा अपात्र ठरलेली महिला कायमची लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.