जात-धर्माचे राजकारण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न?" परतवाडा प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:42 IST2026-04-16T16:23:01+5:302026-04-16T16:42:46+5:30
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी भाजपवर 'दंगली घडवण्याचा प्रयत्न' करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

जात-धर्माचे राजकारण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न?" परतवाडा प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल
परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटनेने अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट आहे. या प्रकरणावरून आता राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी भाजपवर 'दंगली घडवण्याचा प्रयत्न' करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
पत्रकारांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "अमरावतीमध्ये जे घडले ते अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला या घटनेचा राग आणि चीड येणारच. मात्र, पीडित महिला ही केवळ पीडित असते, तिला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी, पण त्याचे भांडवल करून समाजातील सलोखा बिघडवणे चुकीचे आहे."
भाजपवर गंभीर आरोप
यशोमती ठाकूर यांनी थेट भाजपला लक्ष्य करत विचारले की, "लोकांना उचकवून आणि जाती-धर्माचे राजकारण करून भाजपला त्या ठिकाणी दंगली घडवायच्या आहेत का? गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याऐवजी समाजात तेढ निर्माण करणे हा देखील एक प्रकारचा गुन्हाच आहे. मग अशा वेळी गुन्हे दाखल का होत नाहीत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न?
"एकीकडे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, दुसरीकडे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे," असा दावा ठाकूर यांनी केला. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की, आरोपींवर कठोर कारवाई करावी, परंतु कोणत्याही परिस्थितीत अमरावतीचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.