सर्व शांतता समित्या बरखास्त होणार

By Admin | Updated: July 17, 2015 23:05 IST2015-07-17T23:05:13+5:302015-07-17T23:05:13+5:30

शासनाचा निर्णय : राज्यातील शांतता व पोलीस मित्र समित्यांची पुनर्स्थापना

All the peace committee will be sacked | सर्व शांतता समित्या बरखास्त होणार

सर्व शांतता समित्या बरखास्त होणार

भरत शास्त्री - बाहुबली -राज्यातील जातीय तणावाच्या परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या विविध शांतता व पोलीस मित्र समित्या बरखास्त करून नवीन समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.सध्या राज्यामध्ये विविध शांतता समित्या, मोहल्ला समित्या आहेत. या समित्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्वच शांतता समित्या बरखास्त करण्यात येणार आहेत. नवीन शांतता समिती स्थापन करताना पोलीस पडताळणी करूनच सदस्यांची निवड केली जाणार आहे. नवीन आदेशानुसार जिल्हा स्तरावरील शांतता समिती, आयुक्तालय स्तरावरील शांतता समिती, तालुका स्तरावरील शांतता समिती, परिमंडल स्तरावरील शांतता समिती, पोलीस ठाणे स्तरावरील शांतता समिती व पोलीस मित्र अशा सहा समित्यांची स्थापना केली जाणार आहे.
वरील समित्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, शिक्षक, वकील, पत्रकार, विविध धर्मांचे प्रतिनिधी, व्यापारी, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पुरोगामी विचारसरणीच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शासकीय नियंत्रणेसह सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांतून निवडलेल्या सर्व समित्यांच्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थाविषयक समस्या, सुरक्षिततेचे उपाय, जातीय सलोख्यासाठी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. विविध धार्मिक समारंभापूर्वी त्या-त्या समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन बैठका करणे, जातीय तणाव किंवा दंगल होऊ नये याबाबत देखील शांतता समितीवर जबाबदारी देण्यात आली आहे.शांतता समितीप्रमाणेच पोलीस मित्रदेखील स्थानिक पातळीवरील समस्या किंवा गुन्ह्यांबाबत माहिती देणे, समाजातील विकृत घटकांवर नियंत्रण ठेवण्यासह सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणार आहेत. एकंदरीतच या नव्या समितीचा शांतता प्रस्थापित होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा आहे.


नवीन शांतता समिती
जिल्हास्तर
आयुक्तालय स्तर
तालुकास्तर
परिमंडळ स्तर
पोलीस ठाणे स्तर
पोलीस मित्र

शांतता समितीची मुख्य कर्तव्ये
कायदा-सुव्यवस्था कायम राखणे
अफवा पसरविणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखणे
धार्मिक कार्यक्रमांमध्ये मिरवणुकीवेळी जातीय सलोखा राखणे
आपत्कालीन स्थितीत शासकीय यंत्रणेसोबत सहकार्य करणे
तंटे-वाद-विवाद यांना स्थानिक पातळीवर संपविणे

Web Title: All the peace committee will be sacked