४२.८ अंश तापमानात शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने अंत; लातूर जिल्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:56 IST2026-04-21T12:51:05+5:302026-04-21T12:56:29+5:30
सावधान! लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्र लाट; औराद शहाजानीत दुर्दैवी घटना

४२.८ अंश तापमानात शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने अंत; लातूर जिल्हा हादरला
औराद शहाजानी (जि. लातूर): निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, सोमवारी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे असून, सोमवारी तो थेट ४२.८ अंशांवर पोहोचला होता.
शेतात काम करताना कोसळले
लक्ष्मण भंडारे सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. प्रखर उन्हामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी (Dehydration) अचानक कमी झाली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ औराद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना निलंगा येथे हलवण्यास सांगितले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
पाणी पातळी कमी झाल्याने झटका
"उन्हाची तीव्रता अधिक असल्याने लक्ष्मण भंडारे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला," अशी माहिती औराद येथील डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि पाच मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.