उन्हाचा कहर! पाळण्यात झोपलेली ८ महिन्यांची चिमुकली पुन्हा उठलीच नाही, उष्माघाताने मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:32 IST2026-04-25T20:31:20+5:302026-04-25T20:32:02+5:30
लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताचा दुसरा बळी? आरोग्य पथक चौकशीसाठी दाखल

उन्हाचा कहर! पाळण्यात झोपलेली ८ महिन्यांची चिमुकली पुन्हा उठलीच नाही, उष्माघाताने मृत्यू?
लातूर : वैशाख वणव्यामुळे जीवाची काहिली होत आहे. रणरणत्या उन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. औसा तालुक्यातील गाेंद्री येथील एका ८ महिने ९ दिवसांच्या चिमुकलीचा उष्माघाताने १९ एप्रिल रोजी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागास मिळाल्याने शनिवारी चौकशीसाठी तालुका आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
शिया नेताजी गोरे असे मयत ८ महिने ९ दिवसांच्या चिमुकलीचे नाव आहे. मयत चिमुकली ही निलंगा तालुक्यातील तुपडी येथील आहे. तिची आई बाळंतपणासाठी माहेरी गोंद्रीत येथे आली होती. काही दिवसांपासून ही चिमुकली आजारी होती. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. माहेरचे घर पत्र्याचे असल्याने १९ एप्रिल रोजी दुपारच्या वेळी उष्णतेमुळे घरातील पाळण्यात झोपलेली बालिका उठली नाही. उष्माघाताने बालिकेचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
या घटनेची माहिती मिळताच तालुकास्तरीय आरोग्य पथक शनिवारी गावात दाखल झाले. प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. त्या चिमुकलीचा मृत्यू कशामुळे झाला, हे वैद्यकीय अहवालानंतर समजणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एस. देवणीकर यांनी सांगितले.
आठवड्यात दुसरा मृत्यू...
तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. २० एप्रिल रोजी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील लक्ष्मण दादाराव भंडारे (६०) हे शेतात काम करताना अचानक जमिनीवर कोसळून मृत्यूमुखी पडले. आठवडाभरात ही दुसरी घटना घडली आहे.