आमच्याही १८ जागा, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:30 IST2026-02-17T17:29:01+5:302026-02-17T17:30:54+5:30
जनसुराज्य व भाजप हे शरीराने वेगळे असले तरी आमच्या दोन्ही पक्षांचा आत्मा एकच

आमच्याही १८ जागा, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष व्हावा, असा आमचा आग्रह आहे. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ हे आमचे २०, तुमचे १२ मग तुमचा अध्यक्ष कसा? असे म्हणत असले तरी जनसुराज्य व भाजप हे शरीराने वेगळे असले तरी आमच्या दोन्ही पक्षांचा आत्मा एकच आहे. आमचे १२ व जनसुराज्यचे ६ असे मिळून आमचे सदस्य १८ होतात. त्यामुळे १८ आणि २० यात फार फरक पडत नसल्याने जिल्हा परिषदेत पहिला अध्यक्ष भाजपचा व्हावा, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. जिल्हा परिषदेत तसा निर्णय झाला तर तेथेही सव्वा वर्षाचे चार अध्यक्ष होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर-उपमहापौरांच्या कार्यालयीन प्रवेशासाठी महापालिकेत आलेल्या मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, महापालिकेच्या राजकारण व प्रशासनात मी, खासदार धनंजय महाडिक व आमदार विनय कोरे ढवळाढवळ करणार नाही. तो आमचा स्वभाव नाही. तशी गरजच नाही. मात्र, विकासकामांत अडथळे करण्याचे काम, त्यानिमित्ताने स्वत:चे काही लाभ मिळवून घेण्याचे काम महापालिकेत होऊ नये. महापालिकेत भाजपचा कमळावरचा महापौर झाला याचा आनंद आहे.
वाचा : महापौरपद मिळाले, तरच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद; राष्ट्रवादीचा पवित्रा
मंत्री पाटील म्हणाले, सुभाष वोरा यांच्यापासून ४० वर्षांपासून ज्यांनी पक्षासाठी कष्ट घेतले त्यांचे हे यश आहे. अनेकांनी आपलं आयुष्य पक्षासाठी घालवलं आहे. त्यामुळे येथे आनंद व्यक्त करण्यासाठी आलो आहे. लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्राच्या योजना आपणाला मिळणार नाहीत. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. ज्या गावांचा हद्दवाढीत समावेश केला जाणार आहे त्या गावांचे काय म्हणणं आहे, हेही विचारात घ्यावं लागेल.
सव्वा वर्षासाठी स्वीकृत सदस्य
महापालिकेत स्वीकृत सदस्यासाठी भाजपकडे तीनजणांचा कोटा आहे. आम्ही प्रत्येकाला सव्वा वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना स्वीकृतची संधी मिळणार आहे. शिवाय, अल्पसंख्याक जातीमधील कार्यकर्त्यांना स्वीकृतची संधी देण्याचा विचार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
टिपू सुलतान आदर्श असूच शकत नाही
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या देशातील कोणताही नागरिक सहन करणार नाही. दगडफेक व्हावी, असं आम्हाला वाटत नाही. पुण्यात जे झाले त्यात दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते होते की समाजकंटक होते याची चौकशी व्हावी; परंतु टिपू सुलतान आमचा आदर्श असू शकत नाही, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.