कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा मतदारसंघांची फेररचना
By समीर देशपांडे | Updated: March 25, 2026 20:08 IST2026-03-25T20:07:35+5:302026-03-25T20:08:00+5:30
मतदारसंघांची रचनाही पुन्हा बदलणार

कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा मतदारसंघांची फेररचना
समीर देशपांडे
कोल्हापूर : केंद्र सरकारने १ मेपासून जनगणनेची घोषणा केली असून, २०२९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. बदललेल्या लोकसंख्येच्या निकषांच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची रचनाही पुन्हा बदलणार आहे.
याआधी २००९ मध्ये सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती. २००९ आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आमदार होते. गडहिंग्लज आणि सांगरूळ हे दोन विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात विधानसभेच्या दहाच जागा शिल्लक राहिल्या. आता पुन्हा केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली आहे. ती २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे.
सध्या असलेल्या दहा मतदारसंघांपैकी कमीत कमी मतदारसंख्या असलेला कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ असून, सर्वांत जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात आहेत. सध्याचे विधानसभा मतदारसंघ हे साडेतीन लाख ते चार लाख लोकसंख्येमागे एक असे आहेत, परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एक आमदार देण्यापेक्षा अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र नव्याने ठरत आहे. अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार हे सूत्र वास्तवात आल्यास जिल्ह्यात १६ आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार, असे सूत्र ठरवल्यास १३ आमदार संख्या होईल.
नेत्यांकडून अंदाज घेणे सुरू
जिल्ह्यातील विद्यमान आमदार, खासदार आणि नेत्यांनी या संभाव्य बदलाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून, काहींनी निवडणूक आयोगातील निवृत्त अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचे संभाव्य चित्र काय असू शकते, याचा अंदाज या नेत्यांना आल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही विभागांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची पद्धत या नेत्यांनी अवलंबली आहे.
१२ लाख लोकसंख्येला एक खासदार
जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाखांहून अधिक असून, १२ लाख लोकसंख्येला एक खासदार असे नवे सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला लोकसभेचा तिसरा खासदार मिळण्याची शक्यता वाढली आहे.
२०११ नुसार जिल्ह्यातील तालुकावार लोकसंख्या
- हातकणंगले ४,९४,७४७
- करवीर ४,८८,४७७
- शिरोळ ३,२०,१३३
- पन्हाळा २,५६,२९६
- कागल २,३०,०७२
- गडहिंग्लज १,९८,५४९
- राधानगरी १,९९,७१३
- चंदगड १,८७,२२०
- शाहूवाडी १,८०३२२
- भुदरगड १,५०,३६८
- आजरा १,२०,२६५
- गगनबावडा ३५,७७२
महाराष्ट्रात वाढणार जागा
लोकसभेच्या जागा ७२ होण्याची शक्यता
विधानसभेच्या ४३२ जागा होण्याची शक्यता