सदाशिव मोरे
आजरा
: तालुक्यातील २६ पैकी २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने व प्रतिष्ठेने लढविल्या गेल्या. गावा-गावात युवकांसह मुंबईकरांचा सहभाग असल्याने तब्बल १० ठिकाणी सत्तांतर व चार कारखाना संचालकांना गावातच मतदारांनी रोखले आहे. २७ जानेवारीला आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षणात सरपंचपद मिळाले नाही, तर उपसरपंचपद मिळालेच पाहिजे, यासाठी विजयी उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावागावातील राजकारण ढवळून निघाले. २१ ग्रामपंचायतीत पक्षीयऐवजी गटागटाने एकत्रित येऊन आघाड्या तयार झाल्या. सत्तांतर घडवित विजयही मिळविला आहे. सत्तारूढ गटाला पराभूत करणे, हाच उद्देश ठेवून आघाड्या झाल्या. आता सरपंचपदाच्या आरक्षणानंतर गावकारभारी निश्चित होणार आहे. आरक्षणात आपला नंबर लागला नाही, तर उपसरपंचपद मिळालेच पाहिजे. प्रभागातील मताधिक्य माझे आहे, मलाच पद मिळाले पाहिजे, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात उपसरपंच पदासाठी आतापासूनच वाटणी सुरू झाली आहे. किणे येथे मसणू सुतार गटाची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे, तर शिरसंगी आजी-माजी कारखाना संचालकांची सत्ता तिसऱ्या आघाडीने उलथवून लावली आहे. सुळेमध्ये युवकांच्या आघाडीने सत्तांतर घडविले. निंगुडगेतही विरोधकांनी दणदणीत विजय मिळविला आहे. हत्तीवडेत सत्तांतर घडवित विरोधकांनी वचपा काढला आहे.
हाळोली, मुरूडेत विरोधी गटांनी सत्तारूढचा सुपडासाफ केला आहे. जाधेवाडी, चिमणे, मुमेवाडी, चव्हाणवाडी, हालेवाडी, बेलेवाडी, देवकांडगाव, मलिग्रे, कोवाडे येथे सत्तारूढ गटांना गड राखण्यात यश मिळाले आहे. पण, आता सरपंच-उपसरपंचपदाची ईर्षा सुरू झाली आहे.
वाटणीच महत्त्वाची ठरणार
सरपंच, उपसरपंचपदाची होणारी वाटणी आरक्षणामुळे प्रत्येक गावात विजयी उमेदवार पदासाठी इच्छुक आहे. निवडून आलेल्यांना सांभाळून ठेवण्यासाठी गावकारभाऱ्यांना सरपंच, उपसरपंचपदाची वाटणी करावी लागणार आहे. आघाडी फुटण्यापेक्षा वाटणीच महत्त्वाची ठरणार आहे.