लोकसहभागातून काम असेल तर त्यामध्ये जिवंतपणा येतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:44+5:302021-02-05T06:52:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, करंजफेण : लोकांनी मनावर घेतले तर काय बदल घडू शकतो, हे कोतोली येथे लोकसहभागातून तलाठी ...

लोकसहभागातून काम असेल तर त्यामध्ये जिवंतपणा येतो
लोकमत न्यूज नेटवर्क, करंजफेण : लोकांनी मनावर घेतले तर काय बदल घडू शकतो, हे कोतोली येथे लोकसहभागातून तलाठी कार्यालय उभारून लोकांनी दाखवून दिले आहे. लोकसहभागातून तब्बल ७० लाखांचे तलाठी कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. गेली कित्येक वर्षे गावाला तलाठी कार्यालयाची इमारत नव्हती. मंडल अधिकारी सतीश ढेंगे व सहकाऱ्यांनी लोकसहभागातून सहा महिन्यांमध्ये दुमजली इमारत उभारली. या सुसज्ज अशा इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कोरोनाच्या अडचणीच्या काळात देखील लोकांनी मदत करून कर्तृत्व दाखवले. त्यामुळे कोतोलीसारख्या ग्रामीण भागात महसूल विभागाची सुसज्ज इमारत उभारली गेली. शासकीय किंवा सार्वजनिक कामात लोक सहभाग असेल तर त्यामध्ये जिवंतपणा येतो, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले. उद्योगपती सोपान पाटील यांनी बांधकामासाठी सढळ हाताने मदत केल्याने त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. दरम्यान, दामोदर पाटील सभागृहाचे उद्घाटन उद्योगपती सोपान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जि.प.चे सदस्य शंकर पाटील, सरपंच प्रकाश पाटील, महिपती चौगले, राजेंद्र लव्हटे, महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
३० कोतोली तलाठी कार्यालय
फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोकसहभागातून बांधलेल्या तलाठी कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.