दीडशे कोटींच्या ढपल्याचे स्पष्टीकरण द्या

By Admin | Updated: April 11, 2015 00:09 IST2015-04-11T00:05:55+5:302015-04-11T00:09:17+5:30

राजू शेट्टी यांची मागणी : पैशापेक्षा ‘गोकुळ’चे हित बघूनच मतदान करण्याचे आवाहन

Explain the collapse of 150 crores | दीडशे कोटींच्या ढपल्याचे स्पष्टीकरण द्या

दीडशे कोटींच्या ढपल्याचे स्पष्टीकरण द्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) सुमारे दीडशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे केला आहे. त्याची सत्यता किती आहे याचे संघाच्या व्यवस्थापनाने प्रत्येक मुद्देनिहाय स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
संघाच्या ठरावधारक मतदारांनीही छोट्या आर्थिक लाभापेक्षा संघ व दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊनच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शेट्टी म्हणाले, ‘सतेज पाटील यांच्या आरोपांबाबत नुसती गोलमाल उत्तरे दिल्यास त्यातून लोकांच्या मनात साशंकता निर्माण होईल. अगोदरच ‘गोकुळ’च्या व्यवहाराबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनात शंका आहेत. कारण या सहकारी संघाचा कारभार पाच-सहा म्होरके कारभारी संचालक आपल्या बापाची संस्था असल्यासारखा करतात. तिथे कोणत्याच व्यवहाराबाबत पारदर्शकता पाळली जात नाही. गोकुळ संघ राज्य व केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेतो; परंतु तरीही संघाला माहितीचा अधिकार लागू होत नाही, असे सांगून कोणतीच माहिती बाहेर जाऊ नये, याची दक्षता घेतली जाते.
‘गोकुळ’ हा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे. त्यांच्या कष्टातूनच संघाला आजचे वैभव प्राप्त झाले आहे. संघाचे जिल्ह्णाच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान आहे. लाखो शेतकऱ्यांचे संसार त्याच्याशी जोडले गेले आहेत म्हणून संघाचा व्यवहार जास्त चोख असला पाहिजे अन्यथा ‘गोकुळ’ची अवस्था ‘महानंद’ किंवा केडीसीसी’ बँकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही.’ ज्यांनी ‘केडीसीसी’ बँक रसातळाला घालवली, अशा पक्षाची मदत घेऊन ‘गोकुळ’मधील सत्तारूढ नक्की काय करू इच्छितात, याचाही खुलासा होण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी केली आहे.


‘गोकुळ’चे मोठेपण कशात...
जिल्ह्यातील दुधाला चांगली चव असल्यानेच ‘गोकुळ’च्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणूनच ‘गोकुळ’चा नावलौकिक आहे. त्याचे श्रेय व्यवस्थापन व संचालकांनी घेऊ नये. गुजरातचे ‘अमूल’ दूध मुंबईत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ काबीज करत आहे. त्यास टक्कर द्यायची झाल्यास कारभार पारदर्शकच ठेवण्याची गरज असल्याचे खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे.


एका मताची ताकद
संघाच्या निवडणुकीत दूध संस्थांचे ठरावधारक मतदार असतात. त्यांना निवडणुकीपुरते खूश करायचे व सत्ता मिळवायची, असा व्यवहार ‘गोकुळ’मध्ये सुरू आहे. त्यामुळे ठरावधारक मतदारांचीच आता जबाबदारी वाढली आहे. संघ कुणाच्या हातात दिल्यावर तो सुरक्षित राहील, याचा विचार त्यांनी करावा.

Web Title: Explain the collapse of 150 crores