Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:37 IST2025-10-07T17:25:16+5:302025-10-07T19:37:25+5:30
जखमी दाम्पत्य रात्रभर कारमध्येच होते

Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी
सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथील सातेरी महादेवाचे दर्शन घेऊन सोमवारी रात्री अकरा वाजता परत येत असताना वाघोबावाडी ते आमशी येथील घाटामध्ये गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी चारशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये प्रगती कॉलनी पाचगाव (ता. करवीर) येथील दत्तात्रय रघुनाथ पोवार (वय ३२) अश्विनी दत्तात्रय पोवार (२८) हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दोघेही रात्रभर दरीतच पडले होते. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय व अश्विनी पोवार मूळ गाव सांगरूळ (सध्या रा. प्रगती कॉलनी, पाचगाव) हे सोमवारी सांगरूळ येथील आपल्या घरी आले होते. दरम्यान, रात्री आठ वाजता ते सातेरी महादेवाच्या दर्शनासाठी जातो असे सांगून बाहेर पडले. दर्शन घेऊन रात्री अकरा वाजता आमशी वाघोबावाडी घाटातून येत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डोंगरातून थेट चारशे फूट दरीत कोसळली.
यामध्ये दत्तात्रय व अश्विनी यांना गंभीर दुखापत झाली. रात्रीच्या अंधारात त्यांचा फोनही सापडला नाही. त्यामुळे मदतीलाही कोण येऊ शकले नाही. त्यामुळे जखमी स्थितीत ते दरीतच पडून राहिले. पहाटे आमशी येथील तरुण व्यायामासाठी जात असताना दरीमध्ये कोणीतरी ओरडत असल्याने तरुणांनी पाहिले असता गाडी कोसळली असल्याचे निदर्शनास आले. तरुणांनी दरीत उतरून हातात हात घेत साखळी करून जखमींना वर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले.
बेपत्ताची तक्रार
सांगरुळला देवाला जावून येतो म्हणून गेलेले दत्तात्रय व अश्विनी घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी करवीर पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दैव बलत्तर म्हणूनच..
चारशे फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातून दैव बलवत्तर असल्यानेच पोवार कुटुंब वाचल्याची चर्चा अपघातस्थळी सुरु होती.
संरक्षण कठडे नसल्याने धोकादायक प्रवास
सातेरी महादेव हे जागृत देवस्थान असून येथे सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आमशी ते वाघोबावाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहेच, त्याचबरोबर घाटात संरक्षण कठडे नसल्याने येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच करावा लागतो.