लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर गडहिंग्लजमधील खाऊ गल्लीतील ११ गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव बुधवारी झालेल्या बांधकाम समितीच्या सभेत करण्यात आला. याबाबतची निविदा प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते. सभापती पाटील आणि विजय भोजे यांच्यात यावेळी निधी वितरणावरून शाब्दिक चकमक उडाली.
गडहिंग्लज बाजारपेठेतच जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये ११ गाळे उभारण्यात आले आहेत. हे गाळे बचत गटांना द्यावेत असा आधी ठराव झाला होता; परंतु याबाबतची ई-निविदा उघडल्यानंतर एकाच व्यक्तीने पाच, दुसऱ्या व्यक्तीने ३ आणि तिसऱ्या व्यक्तीने ३ अशा निविदा भरल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात येथील गाळ्यांना पाच, सहा हजार भाडे असताना या सर्वांनी ४८०० भाड्याची निविदा भरली आहे. एकाच व्यक्तीला पाच गाळे कसे देता अशी विचारणा सदस्यांनी केली. अखेर जोरदार चर्चेनंतर ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. प्रसाद खोबरे यांच्यासह सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
ग्रामपंचायतींना नेट जोडण्याकामी केबल टाकण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. मात्र खुदाई केल्याबद्दलची भरपाई जिल्हा परिषदेला मिळत नसल्याची वस्तुस्थिती यावेळी मांडण्यात आली. तसेच रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची जबाबदारीही संबंधित कंपन्या पार पाडत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असाही ठराव यावेळी करण्यात आला. यावेळी विजया पाटील, अर्जुन आबिटकर, अमर पाटील उपस्थित होते.
चौकट
विषय न्यायालयात जाण्याची शक्यता
निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर ज्यांनी ती भरली आहे, त्यांच्या नावांना सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाकडे केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून परवानगी मागितली आहे. असे असताना ही प्रक्रियाच रद्द करण्याने न्यायालयात जाण्याला वाव करून देण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे.