आमच्या संस्था पाकिस्तानातील आहेत का? संतप्त संस्था प्रतिनिधींची विचारणा; दुग्ध सहायक निबंधक कार्यालयावर धडक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:27 IST2026-04-17T15:26:36+5:302026-04-17T15:27:19+5:30
मोर्चेकऱ्यांनी तक्रारदार बेलवाडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सहायक निबंधकांच्या कार्यालयात घुसले. अधिकारी कदम कार्यालयात नसल्याने संतप्त झाले.

आमच्या संस्था पाकिस्तानातील आहेत का? संतप्त संस्था प्रतिनिधींची विचारणा; दुग्ध सहायक निबंधक कार्यालयावर धडक मोर्चा
कोल्हापूर : गोकुळशी संलग्न दूध असलेल्या काही दूध संस्थांच्या पात्र, अपात्रतेसंबंधीच्या सुनावण्या अचानक बंद केल्याने संतप्त झालेल्या संस्था प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. १६) सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.
गोकुळला अनेक वर्षांपासून दूध पुरवठा सुरू आहे. यापूर्वी मतदानही केले आहे. तरीही आमच्या संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया राबवण्याचे कारण काय? आमच्या संस्था काय पाकिस्तानातील आहेत काय, असा संतप्त सवालही यावेळी प्रतिनिधींनी उपस्थित केला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गोकुळशी संलग्न असलेल्या जिल्ह्यातील ११०८ दूध संस्थांच्या पात्र, अपात्र प्रकरणी दुग्धचे सहायक निबंधक सुजय कदम यांच्यासमोर सुनावणी सुरू आहेत. ७ ते १३ एप्रिलपर्यंत ३९९ दूध संस्थांच्या सुनावण्या झाल्या. मात्र बुधवारी कदम हे प्रशासकीय कामानिमित्त मुंबईला गेल्याने सुनावणी झाल्या नाहीत. यामुळे संस्था प्रतिनिधींचा हेलपाटा झाला. यामुळे संतप्त झालेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढला.
मोर्चेकऱ्यांनी तक्रारदार बेलवाडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सहायक निबंधकांच्या कार्यालयात घुसले. अधिकारी कदम कार्यालयात नसल्याने संतप्त झाले. यावेळी जिल्हा अदृश्य शक्तीला खड्यासारखे बाजूला करणार दूध संस्था अवसायनात काढून गोकुळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. यामागे असलेल्या अदृश्य शक्तीचा शोध घेतला आहे, त्यांना गोकुळ निवडणुकीतून खड्यासारखे बाजूला करण्याचा इशाराही दूध संस्था प्रतिनिधींनी दिला. बँकचे संचालक भय्या माने यांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधत सुनावण्या का थांबवल्या? ११०८ दूध संस्थांचे काम नियमित सुरू असताना कोणीही उठून दूध संस्था बेकायदेशीर आहेत म्हणणे चुकीचे आहे असे सुनावले.
यावेळी संजय येजरे म्हणाले, गोकुळला बदनाम करून अमूल दूधवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र गोकुळ वाचले तरच आपल्या सर्वसामान्यांचे कल्याण होईल. यामुळे अदृश्य शक्तींना सामोरे जात त्यांना नेस्तनाबूत करूया. कायद्यातील तरतुदीप्रमाणे सुनावण्या घ्याव्यात. ज्यांना याबाबत शंका आहे त्यांनी कार्यालयात येऊन कागदपत्रे तपासावीत.
जिल्ह्यातील दूध संस्था अवसायानात काढण्याचा घाट घातला जात आहे. त्यापूर्वी दहा दिवस अगोदर सुनावण्या सुरू आहेत. मात्र दोन दिवसापासून सुजय कदम बेपत्ता झाले आहेत. त्यांनी ४०० ते ५०० दूध संस्थांची तपासणी केली आहे. ज्या दूध संस्थांची तपासणी झाली त्यांचा निकाल त्वरित दिला पाहिजे. यावेळी दिनकर कोतेकर, विकास पाटील, राहुल शिरकोळे, विजयसिंह पाटील, संजय चितारी, प्रवीण भोसले, रवी पाटील, दत्ता पाटील उपस्थित होते.