कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:59 IST2023-08-05T13:54:02+5:302023-08-05T13:59:05+5:30
राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा
निवास पाटील
सोळांकूर: काळम्मावाडी धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग विद्युत जनित्राद्वारे नदीपात्रात सुरु आहे. धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने कोणत्याही क्षणी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण परिक्षेञात आज दिवसभरात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर १९०२ मिलिमीटर पाऊस होऊन धरणात १९.७० टी.एम.सी म्हणजे ८० टक्के इतका पाणीसाठा आहे. पाऊस उशिरा सूरू झाला असला तरी गेल्या काही दिवसात संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. यावर्षी धरणात केवळ मृत पाणी साठा शिल्लक होता. यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट ओढावले होते. मात्र पावसाच्या दमदार हजेरीमुळे पाणी टंचाईचे संकट टळले.
सतर्कतेचा इशारा
धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. जलाशय परीचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरिता आज धरणाच्या वक्र द्वारातून व विद्युत गृहातून नदीपात्रात टप्प्या टप्प्या ने २००० क्युसेक विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुधगंगा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखाली
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या, मात्र दुपारनंतर उघडीप राहिली. अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी ऊन पावसाचा खेळही सुरु राहिला. धरणक्षेत्रात चांगला पाऊस असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. मात्र आज सकाळी सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
पाच-सहा दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरु असल्याने नद्यांची पाणी पातळी हळूहळू ओसरू लागली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची उघडीप होती, मात्र रात्री रिपरिप सुरु झाली. शुक्रवारी सकाळ पासून जोर कायम होता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड व करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर अधिक होता.
धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ८५७५ घनफूट पाणी वारणा नदीत येत असल्याने येथील पुराचे पाणी हळूहळू कमी होत असल्याने यावरील सहा बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.