US-Israel-Iran war: कोल्हापूर जिल्ह्यातील ८० नागरिक सुखरूप परतले, नातेवाइकांचा जीव पडला भांड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:45 IST2026-03-07T11:43:40+5:302026-03-07T11:45:01+5:30
खर्च झाला दुप्पट

US-Israel-Iran war: कोल्हापूर जिल्ह्यातील ८० नागरिक सुखरूप परतले, नातेवाइकांचा जीव पडला भांड्यात
कोल्हापूर : इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ८० नागरिक शुक्रवारी सुखरूप कोल्हापुरात परतल्याने त्यांच्या नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन ऑफ कोल्हापूरने सातत्याने यासाठी पाठपुरावा केला.
जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधण्यात येत होता. इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी गेलेले १५९ पर्यटक; कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले ३९ नागरिक; कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील ७ सदस्य आणि दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले २ असे एकूण २०७ नागरिक अडकले होते.
यांपैकी पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक आधीच जिल्ह्यात सुखरूप परतले. दरम्यान, दि. ५ मार्च रोजी ८० नागरिक दुबईहून निघाले. यातील ३५ जण मुंबईमार्गे आणि उर्वरित बंगळुरूमार्गे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे प्रशासनाच्या संपर्कात होते.
खर्च झाला दुप्पट
२४ फेब्रुवारी रोजी ६० जणांच्या एका ग्रुपसोबत कोल्हापुरातून सतीश पोवार यांनी दुबई सहलीचे नियोजन केले होते. इंडिगो कंपनीची विमान सेवा रद्द झाल्याने एमिरात विमान कंपनीचे विमान तिप्पट दराने स्वीकारावे लागले. एक गट सकाळी आणि दुसरा गट सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाला. दुबईतील वास्तव्याचा खर्च जरी ते सरकार करणार असले तरी बिले दिल्यानंतर ती रक्कम परत मिळणार आहे.