रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ३४ कोटी ३६ लाखाची निविदा; तीन वेळा निविदा काढूनही मिळाला नाही प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 20:26 IST2026-04-24T20:26:11+5:302026-04-24T20:26:32+5:30
नव्याने निविदा काढणार : सात दिवसात प्रक्रिया पार पडणार

रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ३४ कोटी ३६ लाखाची निविदा; तीन वेळा निविदा काढूनही मिळाला नाही प्रतिसाद
कल्याण : कल्याण डोंबिवली महपालिकेच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या निविदा नव्याने काढण्यास शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीत सभापती मल्लेश शेट्टी यांनी मंजूरी दिली आहे. ३४ कोटी ३६ लाख रुपये खर्चाच्या निविदा महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रात विभागून काढल्या जाणार आहेत.
पावसाळा जवळ आला तरी महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाच्या निविदा का काढल्या नाहीत ? निविदांचे काय झाले ? असा प्रश्न भाजपचे सदस्य दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी प्रश्नासनाकडे उपस्थित केला. त्यावर शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी माहिती दिली की, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता ३४ कोटी ३६ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होता. तीन वेळा निविदा मागवून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. निविदा भरणारे कंत्राटदारांकडून स्टार रेटची मागणी केली जात होती. हा स्टार रेट देण्याचा विषय असल्याने निविदांना तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस स्टार रेट देण्याचा विषयी अपवादात्मक विशेष बाब म्हणून प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आत्ता नव्याने निविदा काढली जाणार आहे. येत्या सात दिवसात निविदांचा विषय मार्गी लावला जाईल. मात्र पावसाळ्यापूर्वी हा विषय मंजूर होऊन कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. अन्यथा मागच्या वर्षी प्रमाणे दिवाळी आली तरी रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नव्हते याकडे सदस्य हळबे यांनी प्रशासनाचे लक्ष्य वेधले.
नालेसफाईच्या कामाच्या निविदांचाही विषय सभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र सगळ्याच निविदाधारकांनी २५ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. तर काही कंत्राटदारांनी निविदा त्यापेक्षा कमी दराची भरली आहे. त्यामुळे या कामांचे प्राकलन तयार करताना प्रशासनाची चूक झाली आहे हा मुद्दा सदस्य म्हात्रे आणि हळबे यांनी उपस्थित केल्याने इतक्या कमी दरात संबंधित कंत्राटदार काम करणार आहे. तर नालेसफाई होईल का? असा सवाल खुद्द समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांनी उपस्थित केला. तेव्हा संबंधित कंत्राटदाराकडून कमी दरात काम केले जात आहे. त्याची लेखी कारणे घेतली आहे. त्याच्याकडून कामाची हमी घेतली आहे. कामावर जीपीएसद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
नाल्यातून किती गाळ काढला जाईल, त्या वजनानुसार कंत्राटदाराला त्याच्या कामाचे बिल दिले जाणार आहे अशी माहिती मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यानी दिली. मात्र काढलेला गाळ टाकण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनेही जागा निश्चीत करुन घ्यावी. निविदा मंजूर करताना त्यात ही बाब नमूद करण्याची मागणी सदस्य म्हात्रे यांनी केली. त्याचा विचार केला जाणार असल्याचे प्रशासनाने आश्वासित केले आहे.