केडीएमसी स्थायी समिती सभेत सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 20:54 IST2026-04-24T20:54:10+5:302026-04-24T20:54:42+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती समितीच्या सभेत सहाय्यक आयुक्त भारत पवार यांना भाजप सदस्य मंदार हळबे यांनी चांगलेच धारेवर धरले.

केडीएमसी स्थायी समिती सभेत सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती समितीच्या सभेत सहाय्यक आयुक्त भारत पवार यांना भाजप सदस्य मंदार हळबे यांनी चांगलेच धारेवर धरले. डोंबिवलीत तीन गाळे सील करण्याची कारवाई पवार यांनी केली. ही कारवाई फेरीवाल्यांच्या सांगण्यावरुन केली आहे. पवार हे कारवाई करण्याच्या नावाखाली फेरीवाल्यांची पाठराखण करीत आहेत, असा गंभीर आरोप हळबे यांनी केला आहे. यावर पवार यांची पूरती बोलतीच बंद झाली होती.
महापालिकेची महासभा २० एप्रिल रोजी पार पडली. या महासभेत फेरीवाला प्रश्नावर सर्व पक्षीय सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. कारवाईच्या आधीच फेरीवाल्यांना त्याची माहिती मिळते. अधिकारी आणि कर्मचारी हे फेरीवाल्यांशी मिळून असल्याचा आरोपही सदस्यांनी केला होता. महासभेत फेरीवाल्याच्या कारवाईवरुन इतके सगळे रणकंदन झाल्यावरही आज पुन्हा स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. भाजप सदस्य हळबे यांनी डोंबिवलीतील एका सोसायटीतील तीन गाळे सहाय्यक आयुक्त पवार यांनी कशाच्या आधारे सील केले. त्याची माहिती द्यावी. त्यावर पवार यांनी माहिती दिली की, या प्रकरणी तक्रार होती. हे गाळे बेकायदेशीर होते. त्यावर हळबे यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे गाळे बेकायदेशीर होते. तर ते सील करण्याची कारवाई करण्यापूर्वी महापालिका अधिनियमानुसार संबंधितांना नोटिस बजावली होती का? त्यावर पवार यांनी नोटिस बजावली नसल्याचे सांगितले. तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या आधारे कारवाई केली.
त्यावर हळबे यांनी संतप्त होत पवार यांच्याकडे फेरीवाल्यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे त्यांनी महापालिकेच्या अधिनियमाचे पालन करता थेट त्यांचा अधिकार वापर गाळे सील केले आहे. हाच धागा पकडत भाजप सदस्य दीपश म्हात्रे हे पवार यांना उद्देशून म्हणाले की, फेरीवाल्या गुंडांना जुमानू नका अन्यथा ही बाब तुमच्या अंगलट येईल. कारवाईत पारदर्शकता ठेवा असे सांगितले.
रात्र निवारा केंद्र की लॉजिंग बोर्डिंग ?
महापालिका हद्दीत डोंबिवली आणि टिटवाळा येथे प्रत्येकी एक रात्र निवारा केंद्र आहे. डोंंबिवलीतील रात्र निवारा केंद्र खाजगी कंत्राटदाराला चालविण्यास देण्याचा विषय सभा पटलावर ठेवला होता. यासाठी सरकारकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र महापालिकेची रात्र निवारा केंद्रे ही लॉजिंग बोर्डिंग झाली आहेत. तसेच काही जणांना त्यांची सून, मुले आदी घरातील मंडळी त्रास देतात म्हणून ही मंडळी रात्र निवारा केंद्रात राहत आहे. या सगळ्यांचा विचार केला जावा याकडेही सदस्य मंदार हळबे यांनी लक्ष वेधले. सदस्यांची तीव्र भावना लक्षात घेता हा विषय सभापती मल्लेश शेट्टी यांनी नामंजूर केला आहे. जेव्हा सरकारकडून निधी प्राप्त होईल तेव्हा हा विषय मंजूरीसाठी आणला जावा असे प्रशासनाला सूचित केले आहे.