मेहरूण तलाव बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:59+5:302021-05-26T04:16:59+5:30

गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे मेहरूण तलावाची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. तलावात सोडण्यात येणारे ...

Mehrun Lake News Add | मेहरूण तलाव बातमी जोड

मेहरूण तलाव बातमी जोड

गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे मेहरूण तलावाची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. तलावात सोडण्यात येणारे सांडपाण्याचे मिश्रण, अनियमित स्वच्छतेमुळे तलाव परिसरात जाणारा कचरा, तलावाचे आटणारे जलस्रोत, पाळीव प्राण्यांचा वापर, तलावात थेट वाहने धुणे आदी समस्यांमुळे तलावाचे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या समस्या पहिल्यांदा सोडविल्या पाहिजेत.

विजय वाणी

मी व आमचा मित्र परिवार गेल्या २० वर्षांपासून नियमित पहाटे मेहरूण चौपाटीवर फिरायला जातो. जळगावकरांना नैसर्गिक वातावरणात फिरण्यासाठी ते एकमेव ठिकाण आहे. मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथे तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कमधील निम्मी झाडे वाळून गेली आहेत. तसेच या ठिकाणी आहे त्या झाडांची तोडणी होत आहे. मनपाचे फक्त सुशोभीकरणाकडे लक्ष आहे, समस्यांकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

किशोर भुतडा

मेहरूण तलाव परिसरातच माझे घर असल्याने, नेहमी तलावाच्या चौपाटीवर सकाळी फिरायला जात असते. तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन तलावातील जलचर प्राणी व वनस्पती नष्ट होत आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या मनपाने त्वरित मार्गी लावावी. तलावाचे सुशोभीकरण करण्याआधी सांडपाण्याचा प्रश्न सोडविल्यावरच तलावाचे अस्तित्व टिकून राहील.

डॉ. सुनीती बेंद्रे

तलाव परिसरात नेहमी टवाळखोर मुलांचा वावर राहत असल्यामुळे फिरण्यासाठी आलेल्या महिलांना भीती वाटते, तसेच अनेक ठिकाणचे पथदिवेही बंद आहेत. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करून टवाळखोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षक नियुक्त केला तर, या ठिकाणी होणारी वृक्षतोड थांबेल.

देवकी नारखेडे

सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत असल्याबाबत, याची कल्पना मनपा प्रशासनाला व शहरातील लोकप्रतिनिधींनाही आहे. मात्र, त्यांनी इतक्या वर्षांत कधीही लक्ष दिले नाही. तलाव परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांत करोडो रुपये खर्च करून विविध प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, इतकाच पैसा जर सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी केला असता, तर तलावाचे पाणी दूषित झाले नसते.

विजय नारखेडे

Web Title: Mehrun Lake News Add