पाकिस्तानमध्ये अज्ञात धुरंधर; अजहरचा उजवा हात मौलाना सलमानचा रस्ते अपघातात मृत्यू, वाहनासह चालक गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:51 IST2026-04-30T13:31:53+5:302026-04-30T13:51:10+5:30
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये अज्ञात धुरंधर; अजहरचा उजवा हात मौलाना सलमानचा रस्ते अपघातात मृत्यू, वाहनासह चालक गायब
Salman Azhar Killed in Pakistan: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये एका भीषण आणि रहस्यमय रस्ते अपघातात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मौलाना सलमान अजहर ठार झाला आहे. एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेने जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयात खळबळ उडाली असून, याला गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या टार्गेट किलिंगचा भाग मानले जात आहे.
जैशचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बहावलपूरमध्ये सलमान अजहर रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. पाकिस्तानी यंत्रणा याला सामान्य अपघात भासवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी, ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि वाहन गायब झाले, त्यावरून ही एक सुनियोजितपणे केलेली हत्या असल्याचे बोलले जात आहे.
कोण होता मौलाना सलमान अजहर?
सलमान अजहर हा केवळ एक कमांडर नव्हता, तर तो जैशचा महत्त्वाचा भाग मानला जात असे. तो वैश्विक दहशतवादी मसूद अजहरच्या अत्यंत जवळचा होता. संघटनेचे सर्व मोठे निर्णय त्याच्या सल्ल्याने घेतले जात. भारतात दहशतवादी हल्ल्यांचे कट रचणे, नवीन तरुणांची भरती करणे आणि दहशतवादासाठी निधी गोळा करण्यात त्याची मुख्य भूमिका होती. त्याच्या मृत्यूमुळे जैशच्या अंतर्गत रचनेला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानात दहशतवाद्यांची रांग लागली
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या भारतविरोधी दहशतवाद्यांचा एकामागून एक काटा काढला जात आहे. ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जून २०२५ मध्ये जैशचा बडा कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसार रहस्यमय स्थितीत मृत आढळला होता. २६ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाचा शेख युसूफ अफ्रिदी हा अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात ठार झाला. अमीर हमजा या लष्कर-ए-तोयबाच्या या संस्थापकावर लाहौरमध्ये जीवघेणा हल्ला झाला, ज्यात तो गंभीर जखमी झाला.
२०२३ पासून सुरू झालेला हा पॅटर्न २०२६ मध्येही तितक्याच वेगाने सुरू आहे. कधी अज्ञात बंदूकधारी जवळून गोळ्या झाडतात, तर कधी संशयास्पद रस्ते अपघात घडवून आणले जातात. महत्त्वाचे म्हणजे, बहावलपूरसारख्या महत्त्वाच्या भागात ही घटना घडल्याने पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.