Pakistan: तेल संपलं, कर्ज वाढलं, अर्थव्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर, पाकिस्तान महासंकटात; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:19 IST2026-03-18T16:17:47+5:302026-03-18T16:19:35+5:30
आधीच आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. अमेरिका-इराण युद्ध, अफगाणिस्तानसोबतचा सीमावाद आणि कर्जाचा वाढता डोंगर वाढल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Pakistan: तेल संपलं, कर्ज वाढलं, अर्थव्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर, पाकिस्तान महासंकटात; कारण काय?
आधीच आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. अमेरिका-इराण युद्ध, अफगाणिस्तानसोबतचा सीमावाद आणि कर्जाचा वाढता डोंगर वाढल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. इंधन साठा संपत आल्याने देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज ७९ हजार ३२२ अब्ज पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये देशांतर्गत कर्ज ५५ हजार ९७८ अब्ज आणि इतर कर्ज २३ हजार ३४४ अब्ज रुपये आहे. हे एकूण कर्ज पाकिस्तानच्या जीडीपीच्या तब्बल ७० टक्के इतके आहे. १९५८ पासून आतापर्यंत आयएमएफकडून २६ वेळा बेलआउट पॅकेज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारलेली नाही.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जगावर तेल संकट ओढवले आहे. इंधनासाठी आयातीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानचा पुरवठा खंडित झाला आहे. माजी अर्थमंत्री हाफिज पाशा यांनी इशारा दिला आहे की, जर कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर राहिल्या, तर पाकिस्तानच्या जीडीपीमध्ये १.५ टक्के घट होऊ शकते. तसेच, किमती १२० डॉलरवर गेल्यास महागाईचा दर ३० टक्के पार करेल, ज्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण होईल.
इंधनाचा तुटवडा आणि आर्थिक टंचाई पाहता सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने सरकारी वाहनांच्या वापरात ६० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार आणि मंत्र्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. शिवाय, सरकारी विभागांच्या खर्चात २० टक्के कपाताची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, अफगाणिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे. या युद्धामुळे सीमावर्ती व्यापार विस्कळीत झाला असून संरक्षण खर्च वाढल्याने तिजोरीवर अतिरिक्त ताण पडला आहे. "पाकिस्तान सध्या अशा वळणावर आहे, जिथे केवळ विदेशी मदत पुरेशी ठरणार नाही. जर इंधनाचा पुरवठा सुरळीत झाला नाही आणि महागाईवर नियंत्रण मिळवले नाही, तर देशात रशिया-युक्रेन युद्धाच्या काळापेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते", असे तज्ज्ञांचे मत आहे.