09 Mar, 26 08:43 PM
वर्धापन दिनी मनसेला मोठं यश, ‘रेणापूर’ तालुक्याचं पटकावलं सभापतीपद
मनसेनं मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामधील रेणापूर पंचायत समितीचं सभापतीपद पटकावलं आहे. रेणापूरमध्ये मनसे आणि भाजपा युतीची सत्ता आली असून, भाजपाच्या पाठिंब्याने येथे मनसेच्या मोनिका सूर्यवंशी सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत.
09 Mar, 26 08:08 PM
फ्रान्स आखातामध्ये दोन युद्धनौका पाठवणार, राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ यांनी केली घोषणा
इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धादरम्यान, फ्रान्स आखातामध्ये दोन युद्धनौका पाठवणार असल्याची घोषणा राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ यांनी केली आहे.
09 Mar, 26 06:57 PM
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्वागत
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबई येथे आज आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
09 Mar, 26 06:44 PM
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा जबाब
अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पायलट सुमित कपूर याची चूक आहे. माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा जबाब व्ही एस आर कंपनीचा मालक व्ही.के सिंग यांनी सीआयडीने केलेल्या चौकशीत दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
09 Mar, 26 05:56 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये घराला भीषण आग
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारं कापड आणि डेकोरेशनचं साहित्य ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणांतच भयंकर परिस्थिती निर्माण झाली.
09 Mar, 26 05:00 PM
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑटो परवाने तात्पुरते स्थगित
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून सोमवारी राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली.
09 Mar, 26 04:18 PM
सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच - चंद्रकांत पाटील
सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे, तो कसा होईल हे योग्य वेळी सांगण्यात येईल असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिप बजावण्याचा अधिकारी संबंधित पक्षाच्या गट प्रमुखांचा असून महायुतीला मतदान केलं नाही तर संबंधित पक्षाचा गटनेता 'त्या' सदस्याचं सदस्यत्व रद्द करेल, असं मी मागील आठवड्यात म्हटलं होतं. त्याचा अनेक राज्यकर्त्यांनी वेगळाच अर्थ काढला, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
09 Mar, 26 04:04 PM
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला! भारतावर आरोप करायला गेला अन् फसला...
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तान या युद्धाचा वापर करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, भारताने पाकिस्तानचा पर्दाफाश केला असून IRIS Dena युद्धनौकेचा व्हिडीओ फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.
09 Mar, 26 02:28 PM
विधानसभेत गाजला हुंडाबळीचा मुद्दा; प्रश्नावर सरकारकडून मिळालं उत्तर
लग्नाच्या नावाखाली अनेक सामान्य घरातील मुलींची फसवणूक केली जाते. या घटना टाळण्यासाठी सरकार काय कारवाई करणार? असा सवाल आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत विचारला. याला उत्तर देताना, 'योजना तयार करून कारवाई केली जाईल', असे मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिले.
09 Mar, 26 01:16 PM
उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
09 Mar, 26 01:13 PM
"हा चुकीचा निर्णय..."; इराणमधील ३० तेल डेपोंवर इस्रायलचा भीषण हल्ला
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या आठव्या दिवशी पहिल्यांदाच अमेरिका आणि इस्रायल यांच्यात गंभीर मतभेद समोर आले आहेत. इस्रायलने शनिवारी एकाच दिवसात इराणच्या ३० इंधन डेपोंवर एकापाठोपाठ एक भीषण हल्ले केले. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले इतके व्यापक असतील याची त्यांना कल्पना नव्हती. अमेरिकेने याला 'चुकीचा निर्णय' असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
09 Mar, 26 01:02 PM
भारताच्या विजयाचा जल्लोष बेतला असता जीवावर; वांद्रे येथील इमारतीला आग
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईत जल्लोष साजरा केला जात असताना एक मोठी दुर्घटना घडली. वांद्रे येथील एका निवासी इमारतीच्या बाल्कनीत फटाक्याचा रॉकेट शिरल्याने भीषण आग लागली. सुदैवाने, मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
09 Mar, 26 11:58 AM
महुआ मोइत्रांच्या विधानाने राजकारण तापलं
तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांचं एक विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीतच महुआ मोइत्रा यांनी "जो टीएमसीसोबत नाही, तो बंगाली नाही आणि त्याला बंगालमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही" असं म्हटलं आहे. यानंतर भाजपाने या विधानावरून महुआ मोइत्रा यांच्यासह संपूर्ण तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. "जे टीएमसीची विचारधारा मानत नाहीत, ते बंगाली नाहीत का?" असा सवाल भाजपाने विचारला आहे. वाचा सविस्तर
09 Mar, 26 11:44 AM
जे बोलायचं ते १९ तारखेला गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेत- राज ठाकरे
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "यावर्षी मी ठरवले की, ९ तारखेला वर्धापन दिन आणि १९ तारखेला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्यामुळे दोन वेळेस बोलण्यापेक्षा जे काही बोलायचे आहे ते मी १९ तारखेला बोलेन. आज महाराष्ट्रातल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. ज्या ज्या वर्दळीच्या जागा आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स लागले पाहिजेत."
09 Mar, 26 11:39 AM
"भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध", इराण युद्धाबद्दल सरकारची राज्यसभेत माहिती
इराण युद्धामुळे आखाती देशामध्ये भारतीय अडकले आहेत. या युद्ध परिस्थितीच्या झळा भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत माहिती दिली.
भारत सार्वभौमत्वाचा समर्थक आहे आणि कोणत्याही समस्येवर मार्ग संवादातूनच काढला गेला पाहिजे, हीच भूमिका आहे. आखाती देशात १ कोटी भारतीय राहतात. त्यांच्या सुरक्षेबद्दल सीसीएसएस बैठकीत चिंता व्यक्त केली आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.
भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. जानेवारी महिन्यातच सरकारने नागरिकांना सावध केलं होतं आणि तातडीने मायदेशी परतण्यास सांगितले होते. भारत आपल्या ऊर्जा विषयक गरजांबद्दल सतर्क असून, या परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे, असेही जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले.
09 Mar, 26 10:06 AM
शेअर बाजार जोरदार आपटला, २ हजारांपेक्षा अधिक घसरण
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स एका क्षणी २,०८१.२३ अंकांच्या प्रचंड घसरणीसह ७४,८३७.६७ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील ६१८.८५ अंकांनी घसरून २३,८३१.०० च्या पातळीवर खाली आला.
09 Mar, 26 09:44 AM
लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात आज अविश्वास प्रस्ताव
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्रही वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. पहिल्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात पहिल्या सत्रातच नोटीस देण्यात आली होती. या नोटीसवर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या अविश्वास प्रस्तावावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सह्या केल्या नव्हत्या, मात्र आता या प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.
नोटीस मंजूर झाल्यानंतर चर्चेची वेळ निश्चित केली जाईल आणि त्यानंतर लोकसभेत चर्चा होईल. या काळात लोकसभेचे कामकाज उपाध्यक्ष करतील. पण, अद्याप उपाध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यामुळे सर्वात वरिष्ठ सदस्य कामकाज बघण्याची शक्यता आहे.
09 Mar, 26 09:28 AM
संसदेच्या अधिवेशनात इराण युद्धाचे पडसाद उमटणार?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून, या दुसऱ्या सत्रात मध्य पूर्वेमध्ये सुरू झालेल्या संघर्षांचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारकडून या संवेदनशील मुद्द्यावर सावध भूमिका घेतली जात आहे. मात्र, यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून आधीच झालेली आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे संसदेत या मुद्द्यावर माहिती देणार आहेत. जयशंकर सकाळी ११ वाजता राज्यसभेत, दुपारी १२ वाजता लोकसभेत निवेदन करणार आहेत.
09 Mar, 26 09:17 AM
सौदी अरेबिया: अल-खर्ज हल्ल्यात एकाही भारतीयाचा मृत्यू नाही; भारतीय दूतावासाचे अधिकृत स्पष्टीकरण
रियाध : सौदी अरेबियातील अल-खर्ज शहरावर झालेल्या इराणच्या हल्ल्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, असे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला काही माध्यमांतून एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते, मात्र दूतावासाने आता या वृत्ताचे खंडन केले आहे.
09 Mar, 26 09:16 AM
बहरीनमध्ये इराणचा भीषण ड्रोन हल्ला; ३२ नागरिक जखमी, ४ जणांची प्रकृती चिंताजनक
इराणने बहरीनच्या सित्रा बेटाला लक्ष्य करून भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३२ हून अधिक बहरीनचे नागरिक जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती बहरीनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.