बांगलादेश लष्करात मोठी खांदेपालट! भारतात तैनात असलेल्या अधिकाऱ्याला बोलवून दिली महत्वाची जबाबदारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:48 IST2026-02-23T11:47:47+5:302026-02-23T11:48:58+5:30
Bangladesh Army Reshuffle: बांगलादेश लष्करात ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हाफिजुर रहमान यांची महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेख हसीना समर्थकांना हटवून तारिक रहमान यांच्या निकटवर्तीयांना स्थान देण्यात आले आहे.

बांगलादेश लष्करात मोठी खांदेपालट! भारतात तैनात असलेल्या अधिकाऱ्याला बोलवून दिली महत्वाची जबाबदारी...
ढाका : बांगलादेशमधील राजकीय उलथापालथीनंतर आता लष्करातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अंतरिम सरकारच्या काळात लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती करण्यात आल्या असून, यामध्ये ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हाफिजुर रहमान यांची नियुक्ती विशेष चर्चेत आहे. हाफिजुर रहमान यांना 'भारतविरोधी' आणि तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी विचारसरणीचे समर्थक मानले जाते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
लष्करातील ही पुनर्रचना शेख हसीना यांच्या कार्यकाळातील प्रभाव पूर्णपणे संपवण्यासाठी करण्यात आली आहे. ब्रिगेडियर जनरल हाफिजुर रहमान यांची पदोन्नती करून त्यांना लष्करातील महत्त्वाच्या सल्लागार पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ते यापूर्वी भारतविरोधी विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत.
हसीना समर्थकांना धक्का
शेख हसीना यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना एकतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे किंवा त्यांची लष्करी मुख्यालयात (संलग्न) बदली करण्यात आली आहे. बांगलादेश नॅशनल पार्टीचे नेते तारिक रहमान यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे.
भारतासाठी चिंतेची बाब?
बांगलादेश लष्करात होत असलेले हे बदल दक्षिण आशियाई राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः हाफिजुर रहमान यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा वाढता प्रभाव भारत-बांगलादेश सीमा सुरक्षा आणि द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करू शकतो. ते दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगात संरक्षण सल्लागार होते आणि डीजीएफआयशी संलग्न होते. त्यांना आता मेजर जनरल म्हणून बढती देण्यात आली आहे आणि सीमावर्ती भागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जशोर येथील ५५ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काही अहवाल असे सूचित करतात की या बदलांचा भारताशी संबंधांवर परिणाम होऊ शकतो. युनूसच्या कार्यकाळात दोन्ही देशांमध्ये तणाव होता, परंतु आता तारिक रहमान यांचे सरकार मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.