७ मे रोजी सकाळपासून हिंगोली न. प. च्या डिग्रस कऱ्हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा दोनदा खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी जलशुद्धीकरणाची प्रक्रिया खंडित झाली होती. त्यानंतर सायंकाळी ४.३० च्या सुमारास डिग्रससह सिद्धेश्वर परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेक विद्युत खांब कोसळले. शिवाय विजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या. त्यामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत होण्यासाठी आता विलंब लागणार आहे. त्यामुळे ८ मे रोजी ज्या भागात नियोजित पाणीपुरवठा करायचा होता, त्या भागात पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार नाही. त्यामुळे या भागाला ९ रोजी पाणीपुरवठा केला जाईल, तर त्यामुळे आपोआपच इतर भागालाही एक दिवस विलंबानेच पाणी मिळणार आहे.
याबाबत हिंगोली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे बाळू बांगर म्हणाले की, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एक दिवसभर पाणीउपसा न झाल्याने शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.