हिंगाेली : पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माळहिवरा येथे १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. पाणीटंचाईने जिल्ह्यातील पहिला बळी घेतला आहे.
राहुल वसंतराव भोसले (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत राहुल भोसले हा घरी पाणी नसल्याने गावाशेजारील हरी वसू यांच्या शेतातील ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी गेला होता. सकाळी पाण्याच्या दोन खेपा घरी आणून टाकल्या होत्या. तिसऱ्या खेपेसाठी परत विहीरीवर गेला होता. मात्र यावेळी पाणी काढण्याची बकेट विहिरीतील आतील कठड्यावर पडली. याच वेळी कठड्यावर पडलेली बकेट काढत असताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पो.ह एस.पी. सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी वसंतराव भोसले यांच्या खबरीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास एस.पी. सांगळे करीत आहेत.