अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:16+5:302021-02-25T04:37:16+5:30
कोरोनाचा धोका वाढू लागला ; तरी कोणालाही वाटेना कोरोनाची भीती हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना जिल्हा सामान्य ...
कोरोनाचा धोका वाढू लागला ; तरी कोणालाही वाटेना कोरोनाची भीती
हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र दिव्यांगांना प्रमाणपत्र देतेवेळेसचे चित्र मात्र पाहण्यासारखेच होते. बुधवारी दिव्यांगांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तोबा गर्दी केली होती. यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
बुधवार हा दिव्यांगांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रमाणपत्र देण्याचा दिवस ठरवून दिला आहे. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. असे असताना मॅनेजमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. परंतु, कोणीच याकडे कसे देत नाही? हा प्रश्न आहे. खरे पाहिले तर ‘एक खिडकी योजना’ यासाठी करायला पाहिजे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रांगेत उभे राहिलेल्या अनेकांना मास्कचे देणेघेणेच नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा तर पार बट्ट्याबोळ उडाला होता. मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र डोके वर काढले आहे. मध्यंतरी चार-पाच महिने दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे बंद केले होते. कोरोना संपला असे गृहीत धरुन जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तीन-चार आठवड्यांपासून दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा बुधवार हा तिसरा होता.
दररोज किती प्रमाणपत्र दिले जातात?
प्रमाणपत्रासाठी कोणालाही परत पाठविले जात नाही. दिवसांतून जवळपास १०० प्रमाणपत्र दिले जातात. प्रमाणपत्र देतेवेळेस सर्व प्रकारची शहानिशा केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. सकाळी दहा ते दुपारी दोन ही वेळ दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठीची राखीव ठेवण्यात आलेली आहे.
प्रतिक्रिया..........
प्रमाणपत्रासाठी आमची ओढाताण...
बुधवार हा दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा दिवस ठेवला आहे. त्यामुळे बुधवारी कामधंदा सोडून आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयात येतो. परंतु, येथील डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. डॉक्टरांनी दिव्यांगांच्या जीवाशी खेळू नये, हे सांगणे महत्त्वाचे वाटते.
दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लगत आहे. वेळेवर प्रमाणपत्र दिले जात नाही. प्रमाणपत्र देतेवेळेस डॉक्टर मध्येच निघून जातात. काही तर व्हीलचेअरवरील अपंग (दिव्यांग) आहेत. दिव्यांग असल्याने ‘सीएस’ साहेबांकडे जाता येत नाही. डॉक्टरांनी दिव्यांगांसाठी वेळ काढणे गरजेचे आहे.
अपंग प्रमाणपत्र कशासाठी ?
शासनाच्या विविध योजनांसाठी अपंग प्रमाणपत्र काढले जाते. अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र असल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. याचबरोबर एखादा विद्यार्थी अपंग असेल तर त्यास शैक्षणिक योजनाचा लाभ मिळत नाही. अपंगांना प्रमाणपत्र देण्याचा बुधवार हा ठरवून दिलेला वार आहे. आठवड्यातून दोन वारी अपंगांना प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरुन शासनाच्या योजनांचा लवकर लाभ घेता येईल. प्रमाणपत्र उशिरा मिळते म्हणून लाभ मिळत नाही. परिणामी, अपंग हे शासनाच्या योजनेपासून वंचित राहतात.
अपंग प्रमाणपत्र ठरवून दिलेल्या दिवशीच वेळेवर वाटप केले जात आहे. यात जर कोणी दिरंगाई करत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. कोरोनाकाळात जी गर्दी होत आहे त्यास आळा घातला जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली
फोटो