गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:12+5:302021-04-10T04:29:12+5:30
हिंगोली : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने मिनी लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ...
हिंगोली : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने मिनी लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे घरातील आर्थिक गणित बिघडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास गळ्यातील सोनेही मोडावे लागणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया महिलांतून व्यक्त होत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे जवळपास पंधरा दिवस व्यवसाय ठप्प पडला होता. त्यानंतर पुन्हा शासनाने ब्रेक द चेन लागू केले आहे. अगोदरच वर्षभरात केवळ दोनच महिने व्यवसाय करण्यास संधी मिळाली. आता कुठे लग्न सराई, सण, उत्सव सुरू झाले होते. मात्र पुन्हा दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने व्यवसायात उधारी, उसनवारी, कर्ज घेऊन गुंतवलेला पैसाही अडकून पडला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. गुंतवलेला पैसा कसा काढावा याची चिंता लागली आहे. याचा परिणाम घरावरही पडत असून गृहिणीसमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवस असेच चित्र राहिले तर गळ्यातील चेन मोडायची वेळ येईल, अशा संतप्त प्रतिक्रीया व्यावसायिकांच्या घरातील गृहिणींमधून व्यक्त होत आहेत.
कर्ज कसे फेडायचे याची लागली चिंता
गतवर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. मध्यंतरी ही संख्या कमी झाल्याने व्यवसाय सुरू झाले होते. त्यानंतर केवळ दोनच महिने खऱ्या अर्थाने व्यवसाय सुरळीत झाला होता. आता पुन्हा व्यवसाय बंद झाल्याने हप्ते, मुलांचा खर्च, विविध कर कसे भरायचे यांची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.
६० दिवसच वर्षभरात जिल्ह्यातील व्यवसाय खऱ्या अर्थाने सुरू होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. घराचे हप्ते, दुकानाचे भाडे, मुलांचा खर्च कसा करावा, याचीच चिंता लागली आहे.
- जी.एन. अग्रवाल (गृहिणी)
कोरोनामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने व्यवसायात गुंतवलेला पैसा अडकून पडला आहे. परिणामी घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात सर्वच कर भरावे लागत असल्याने दुकानाचे भाडे व कर कसे भरावेत, ही चिंता भेडसावत आहे.
- भावना संचित गुंडेवार,
खाजगी कर्ज काढून व्यवसायत पैसा गुंतविला आहे. आता हे कर्ज कसे फेडायचे, घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे, याची चिंता लागली आहे. शासनाने बाजारपेठ खुली करावी.
-मंजूषा पवन मुंदडा,
कर्ज काढून व्यवसायात पैसा गुंतविला आहे. त्यात संचारबंदीने व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यात कोणतेच कर माफ केले नाहीत. त्यामुळे जगायचे कसे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. -
- अश्वीनी किशोर गुंडेवार
फाेटाे नं. २४