नळांना पाणी वेळेवर सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:22+5:302021-02-25T04:37:22+5:30
वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथे मागील काही दिवसांपासून वानरांनी धुमाकूळ घालणे सुरु ...
वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथे मागील काही दिवसांपासून वानरांनी धुमाकूळ घालणे सुरु केले आहे. घरांच्या छतावरून उड्या मारत वानर अंगणातील वस्तुंची नासाडी करीत आहेत. यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाहक - चालक अजूनही मास्कविनाच
हिंगोली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्वांनाच मास्क घालणे बंधनकारक केले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. एवढे असतानाही चालक व वाहक मात्र विनामास्क बस चालवत आहेत. खरे पाहिले तर चालक व वाहकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठांनी या बाबीची दखल घेणे गरजेचे आहे.
रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहर व परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे वाहनचाकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर, इंदिरा नगर, शिवाजीनगर, मंगळवारा आदी भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. याचबरोबर वीज खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.
बसेस बाहेर निघण्यास ऑटोंचा अडथळा
हिंगोली : मागील काही दिवसांपासून बसस्थानकाच्या गेटवर ऑटो उभे केले जात आहेत. यामुळे बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले. परंतु, अद्याप या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष गेलेले दिसत नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन गेटवर होणारी गर्दी कमी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वातावरणात बदल: आजारांना निमंत्रण
हिंगोली : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. वातावरण बदलामुळे ताप, खोकला, डोके दुखणे, अंग दुखणे आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.